निंबवली–राया परिसरातून समृद्धीकडे इन-आऊटची जोरदार हाक!
समृद्धी महामार्ग शेजारी, पण प्रवेशबिंदू नाही
निंबवली-राया ग्रामस्थांकडून सरकारवर नाराजी; विकासाची दारे उघडण्याची मागणी
टिटवाळा, ता. १० (वार्ताहर) : महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राज्यभर वेगवान संपर्क आणि विकासाची नवी शिदोरी बांधत असताना, निंबवली आणि राया परिसरातील नागरिक मात्र या लाभापासून वंचित आहेत. महामार्गाच्या अगदी शेजारीच सर्वात मोठा टोलनाका असूनही इन-आऊट प्रवेशबिंदू न दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात भाजप कल्याण तालुका ग्रामीण युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनिल केणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निंबवली-राया परिसर हा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून, टिटवाळा श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक देशभरातून दाखल होतात. भातसा नदी पर्यटन, खडवली-नाशिक महामार्ग, कल्याण-नगर महामार्ग, टिटवाळा-कळवा रिंगरूट या बाबींचा विचार करता वाहतुकीचे प्रमुख मार्ग समृद्धीला जोडण्यासाठी हीच सर्वोत्तम जागा असल्याचा मतमतांतरांचा सूर आहे. समृद्धी महामार्गासाठी कल्याण ग्रामीणच्या ग्रामस्थांनी कोणताही विरोध न करता जमीन उपलब्ध करून दिली. या मार्गावर सुरुवातीला इन-आऊटचा मार्ग दाखवला, मात्र नंतर तो बंद केल्याने ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे.
समृद्धी महामार्ग राज्यातील प्रत्येक कोपरा जोडेल, असे सरकार सांगते. मग कल्याण ग्रामीणला प्रवेशबिंदू का नाही? कल्याण ग्रामीणमधील निंबवली-राया टोलनाक्यावर इन-आऊट सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रवेशबिंदू सुरू झाल्यास टिटवाळ्यात पर्यटन, उद्योगधंदे, रोजगार क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि कल्याण ग्रामीण नकाशावर ठळकपणे उभा राहील, असे ग्रामस्थांचे मत आहे. जमीन आम्ही दिली, मात्र महामार्गाचा लाभ नाकारला? विकासाचा मार्ग बंद कसा, असे म्हणत ग्रामस्थांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
प्रवेशबिंदू सुरू झाल्यास ‘हे’ फायदे
- भाविक, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्णवाहिकेला जलद व सुरक्षित प्रवास
- शेतीमाल वाहतुकीला वेग मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
- रोजगार संधी आणि पर्यटन विकासाची नवी दारे उघडतील
हा महामार्ग झाल्यास स्थानिक ग्रामीण विकासला, रोजगाराला चालना मिळेल, असे अनेक स्वप्न प्रशासनाने दाखवली. त्यामुळे महामार्गासाठी जागा दिली. टोलही भरण्याची तयारी असतानादेखील आमच्यासाठीच प्रवेश बंद का? सरकारने कल्याण ग्रामीणची उपेक्षा थांबववून विकासाला वेग द्यावा. येथील शेणा-मातीत राबणाऱ्या लोकांसाठीदेखील विकासाची दारे उघडलीच पाहिजेत.
- अनिल केणे, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

