भातपिकाला हमी भाव द्या। विक्रमगडमधील शेतक-यांची मागणी
बाजारपेठेअभावी शेतकरी चिंतेत
विक्रमगडमध्ये भातपिकाला त्वरित हमीभाव देण्याची मागणी
विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात ७,८५८ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते आणि भात हेच येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे; मात्र यंदा पिकविलेल्या भातपिकाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने आणि तालुक्यात भात खरेदीसाठी मोठी व योग्य बाजारपेठ नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
विक्रमगड तालुक्यात ‘जया, रत्ना, सुवर्णा, कोलम, मसुरी’ आणि गावठी तांदळाचे वाण मोठ्या प्रमाणात पिकवले जातात. वाढती मजुरी, खतांच्या व बियाण्यांच्या किंमतीतील वाढ आणि निसर्गाचा लहरीपणा या सगळ्या संकटांतून पिकवलेले भात बाजारात विक्रीसाठी आले असतानाही शासनाने अद्याप भात खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांवर कमी दरात भात विकावे लागण्याची वेळ आली आहे, परिणामी भातशेतीचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. आज महागाई इतकी वाढली आहे की, शेती करणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत आहे आणि उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसेल, तर शेतकरी काय करणार? अशी भावना येथील स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.
-------------
हमीभावाची गरज
शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबलेले असून, भातविक्रीतून मिळालेल्या पैशातूनच त्यांना वर्षभराचा उदरनिर्वाह आणि कर्जाची परतफेड करायची आहे. योग्य हमीभाव न मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही, ज्यामुळे आत्महत्यांसारखे प्रकार घडतात, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
-------------
भातशेतीचा खर्च परवडेना
भातशेतीला उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन क्षमता कमी शिवाय शासनाचे भातपिक शेतकऱ्यांकडे असलेले दुर्लक्ष यामुळे भातशेती परवडत नाही. भातपीक तयार होऊन विक्रीस आणले जात आहे, परंतु अद्यापही खरेदी केंद्रे सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. शेतकऱ्यांना पडलेल्या कमी भावात भातपिकाची विक्री करावे लागते. योग्य भाव व बाजारपेठ नसल्याने भातशेती परवडेना अशी झाली आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसाय संकटाला सामोरे जात असल्याने तरुणवर्गदेखील या व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत आहे.
-------------
निसर्गाचा लहरीपणा, वाढती महागाई, पिकांवर येणारा रोग त्यामुळे शेती पिकवणे कष्टाचे झाले असून, केलेला खर्चही वसूल होत नाही. शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत चाललेला आहे. त्यामुळे उत्पनादीत केलेल्या मालाला योग्य हमीभाव व योग्य अशी बाजारपेठ असणे आवश्यक आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाच्या खरेदी करीता भात खरेदी केंद्रे चालू करून दिलासा द्यावा.
- घनश्याम आळशी, तालुका अध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

