महाराष्ट्र–गुजरात सीमावादाला नवे वळण

महाराष्ट्र–गुजरात सीमावादाला नवे वळण

Published on

इंचभरही जमीन गुजरातला देणार नाही!
मनसेचे अविनाश जाधव यांचा इशारा; सीमावादाला नवे वळण

तलासरी, ता. १६ (बातमीदार) ः तालुक्यातील वेवजी गाव परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र-गुजरात सीमावाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उडी घेतल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
सीमावाद सोडवण्यासाठी १० डिसेंबर रोजी महाराष्ट्र व गुजरात शासनातर्फे संयुक्त सीमा मोजणीला सुरुवात करण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे हद्द निश्चितीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते, मात्र मोजणीदरम्यान गुजरातकडून महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केल्यानंतर ही संयुक्त मोजणी तात्पुरती स्थगित करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १५) मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वेवजी गावाला भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी ग्रामस्थांनी गुजरात राज्याकडून महाराष्ट्राच्या हद्दीत सुमारे ८०० मीटर ते १ किलोमीटरपर्यंत अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप केला. एकीकडे शासन पातळीवर संयुक्त मोजणीद्वारे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्र-गुजरात सीमावाद पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
---
सविस्तर चर्चा
सीमावादामुळे वेवजी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पाहणीनंतर अविनाश जाधव यांनी झाई-बोरीगाव परिसरालाही भेट दिली. तसेच तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक यांची भेट घेऊन सीमावादासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
---
दीर्घकाळ वाद
हा सीमावाद तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आहे. गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील सर्वे नंबर २०४ लगतच्या भागात अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तलासरी-उंबरगाव राज्यमार्गालगत असलेल्या या भागाची अधिकृत सीमा अद्याप निश्चित न झाल्याने दोन्ही राज्यांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.
--
कोट.
इंचभरही महाराष्ट्राची जमीन गुजरातला देणार नाही. गुजरात पोलिसांकडून स्थानिक नागरिकांवर होत असलेल्या कथित कारवाईचा तीव्र निषेध करतो आहे. महाराष्ट्र शासनाने सीमावाद तातडीने मार्गी लावला नाही, तर वेवजी परिसरात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- अविनाश जाधव, मनसे नेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com