आचारसंहितेमुळे कांदिवली परिसर बॅनरमुक्त

आचारसंहितेमुळे कांदिवली परिसर बॅनरमुक्त

Published on

आचारसंहितेमुळे कांदिवली परिसर बॅनरमुक्त
रस्ते, चौक झाले चकाचक
कांदिवली, ता. १८ (बातमीदार) ः राज्य निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू करण्यात आल्याने कांदिवली विभागात पालिकेने धडक कारवाई करत परिसर बॅनरमुक्त केला आहे. वर्षभर लावलेले बॅनर, जाहिराती, फ्लेक्स, पोस्टर, स्टिकर्स, किऑस्क, फलक आणि ध्वज मोठ्या प्रमाणावर काढण्यात आले असून, ही कारवाई अद्याप सुरूच आहे. या मोहिमेमुळे परिसर स्वच्छ, सुंदर आणि चकाचक झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
बॅनर आणि होर्डिंगमुळे विद्रूप झालेल्या नाके, रस्ते, विजेचे खांब, दुभाजक, उड्डाणपूल, सिग्नल तसेच सुशोभीकरण केलेले चौक अनेक महिन्यांनंतर मोकळा श्वास घेत आहेत. या बदलामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवासी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि उपायुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कार्यक्षेत्रात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये यासाठी पालिकेने विशेष दक्षता घेतल्याने परिसर विद्रुपीकरणापासून मुक्त झाला आहे.
कांदिवलीत कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या चौक, स्कायवॉक, सिग्नल चौक, विजेचे खांब आणि नाक्यानाक्यावर वर्षभर बांबूचे ढाचे उभारून बॅनरबाजी, जाहिराती, फ्लेक्स व झेंडे लावले जात होते. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी सिग्नलही बॅनरमुळे दिसत नव्हते, मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा परिसर पुन्हा खुला आणि देखणा झाला आहे.
तथापि, बॅनर काढण्यात आले असले तरी अनेक चौकांवर उभारलेले बांबूचे ढाचे आणि लाकडी फ्रेम अद्याप तशाच आहेत. अशोक नगर, अशोक चक्रवर्ती मार्ग, आत्मीय मार्ग, एस. व्ही. रोडवरील अदानी कार्यालय परिसर, जीवन दास मटानी चौक, हिंदुस्थान नाका आणि चारकोप मार्केट येथे हे ढाचे अजूनही दिसून येतात. त्यामुळे बॅनरसोबतच बांबूचे ढाचेही काढावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आचारसंहितेमुळे मिळालेला हा स्वच्छतेचा अनुभव कायम ठेवण्यासाठी पालिकेने वर्षभर ठोस धोरण राबवावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

कार्यक्रम, सण, उत्सव, वाढदिवस तसेच राजकीय प्रसिद्धीसाठी लावल्या जाणाऱ्या बॅनरमुळे परिसर विद्रूप होतो. आचारसंहिता लागू होताच सर्व काही स्वच्छ झाले. सरकारने वर्षभर बॅनरमुक्त संहिता राबवावी.
- यतीन भिंगार्डे, नागरिक

जवळपास सर्व बॅनर काढण्यात आले असून, उर्वरित काढण्याचे काम सुरू आहे. बांबूचे ढाचे आणि लाकडी फ्रेम काढण्यासाठी परिरक्षण विभागाला कळविण्यात आले आहे.
- रमेशकुमार सिंग,
वरिष्ठ निरीक्षक, आर दक्षिण अतिक्रमण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com