स्थलांतरामुळे भिवंडीतील जुनी मंदिरे ओसाड
पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. २८ : गेल्या काही वर्षांत भिवंडी शहराचा विस्तार आणि इमारतींचे वाढते जाळे यामुळे जुन्या लोकवस्तीतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. याचा थेट परिणाम परिसरातील परंपरागत मंदिरांवर झाला आहे. अनेक मंदिरे आज ओस पडलेली दिसत आहेत. आजमितीला शहरातील काही भागांमध्ये सकाळ-संध्याकाळ दिवा लावण्यासाठीही कुणी उरलेले नाही. या परिस्थितीबाबत शहरातील ज्येष्ठ व जाणकार नागरिकांनी तीव्र खेद व्यक्त करत स्थानिक नागरिक, पालिका प्रशासन व सामाजिक संघटनांनी या मंदिरांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
यंत्रमाग उद्योगासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या भिवंडी शहरात एकेकाळी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध असल्याने येथील कानाकोपऱ्यात मानवी वस्त्या फुलल्या होत्या. विविध राज्यांतून आलेल्या कामगार व व्यापाऱ्यांचा शहराच्या सामाजिक व आर्थिक व्यवस्थेवर ठाम विश्वास होता. भिवंडीत काही वर्षांत अत्याधुनिक ऑटोमॅटिक यंत्रमाग आल्याने पारंपरिक यंत्रमाग व्यवसाय मात्र अडचणीत सापडला. अनेक व्यावसायिकांनी जुने यंत्रमाग विकून त्या जागी आधुनिक यंत्रमाग उभारले. तर काहींनी कारखाने विकून वाणिज्य व रहिवासी इमारती उभारल्या. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रशासनाचे लक्ष मुख्यत्वे टोलेजंग इमारतींकडे केंद्रित राहिल्याने पिढ्यानपिढ्या वसलेल्या कामगार वस्त्यांना आवश्यक नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. परिणामी, अनेक कुटुंबे शहराबाहेर स्थलांतरित झाली.
शहरातील काही कामगार वस्त्यांमध्ये विकासकांचा शिरकाव झाल्यानंतर अधिकृत व अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे विविध जाती-धर्मातील रहिवासी त्या परिसरातून स्थलांतरित झाले आणि त्या ठिकाणच्या परंपरागत मंदिरांकडे दुर्लक्ष झाले. सध्या भिवंडी शहरात अंदाजे १५ ते २० अशी जुनी मंदिरे आहेत. ती हळूहळू दुर्लक्षित होत चालल्याचे चित्र आहे.
भिवंडी हे मुस्लिमबहुल शहर असल्याने अनेक खासगी व सार्वजनिक मंदिरांकडे प्रामुख्याने सण, उत्सव किंवा जयंतीच्या दिवशीच लक्ष दिले जाते. मात्र, नियमित वहिवाट कमी झाल्याने भविष्यात काही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिका व पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुर्लक्षित मंदिरे
कारिवली रोडवरील मंदिरे, कोटरगेट येथील हनुमान मंदिर, मॉलशेजारील हनुमान मंदिर, कणेरी परिसरातील मंदिरे; तसेच शहरातील इतर भागांतील अनेक देवस्थाने सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहेत. काही वर्षांत नव्याने उभारलेल्या मंदिरांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे जुन्या व परंपरागत मंदिरांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत गोरगरीब व ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
दत्तक घेऊन जीर्णोद्धाराची मागणी
सध्या शहरात निवडणुकीचे वातावरण असून, हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू आहे. मात्र अशा जुन्या मंदिरांच्या जतन व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ही मंदिरे दत्तक घेऊन त्यांचा जीर्णोद्धार व विस्तार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भिवंडीतील काही खासगी मंदिरांच्या मालकांशी संपर्क साधला असता, त्यांच्या न्यायालयीन दावे सुरू असल्याची माहिती मिळाली. तर सार्वजनिक मंदिरांबाबत परिसरात जनजागृती करून नियमित वहिवाट सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बजरंग दलाच्या माध्यमातून काही मंदिरांचा जीर्णोद्धार सुरू आहे.
- वैभव महाडिक, सहमंत्री,
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकारी
भिवंडी : तालुक्यातील अनेक मंदिरे आज बंद आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

