चोवीस तासात युतीचा निर्णय घ्या

चोवीस तासात युतीचा निर्णय घ्या

Published on

चोवीस तासांत युतीचा निर्णय घ्या
शिवसेना शिंदे गटाचा भाजपला निर्वाणीचा इशारा

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, भाजप शिवसेना युती होण्याच्या दिशेने कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे युती करायची की नाही, यावर २४ तासांत निर्णय घ्यावा अन्यथा निर्णायक भूमिका घ्यायला शिवसेना मोकळी आहे, असा निर्वाणीचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपला दिला आहे.

भाजप शिवसेना युतीचे घोडे अद्याप अडलले आहे. जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समितीची पहिली बैठकही शुक्रवारी (ता. २६) पार पडली; मात्र त्यानंतर पुढे काहीच हालचाल झालेली नाही. भाजपने ९५ पैकी शिवसेनेला अवघ्या १३ जागा देऊ केल्या असून, काही अटीदेखील घातल्या आहेत; मात्र शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नाही. शिवसेनेचे गेल्यावेळी २२ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे या २२ जागा तसेच ज्या प्रभागात सेनेचे नगरसेवक निवडून आलेले नाहीत त्या प्रत्येक प्रभागात एक जागा देण्यात यावी, असा ठाणे पॅटर्नचा प्रस्ताव सेनेने भाजपला दिला आहे; मात्र या प्रस्तावावर भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

रविवारी (ता. २८) यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आहे. ज्याप्रमाणे ठाण्यात युतीसाठी सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मिरा-भाईंदरमध्ये जागा वाटप व्हावे असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाशी बोलतो असे सांगितले आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येत्या २४ तासांत भाजपने युती संदर्भात निर्णय घेतला नाही तर शिवसेना अंतिम निर्णय घ्यायला मोकळी आहे, असा निर्वाणीचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.

भाजपने घातलेल्या अटीसंदर्भातही सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेने घेतलेले भाजपचे पदाधिकारी परत करावे, असे मेहता यांचे म्हणणे आहे. त्यानुसार शिवसेना भाजपचे पदाधिकारी परत करण्यास तयार आहे मात्र त्याचबरोबर भाजपने शिवसेनेचे घेतलेले चार नगरसेवकही भाजपने परत करावे, असे प्रत्त्युत्तर सरनाईक यांनी दिले आहे. मिरा रोड येथील टाऊन पार्कच्या जागेत कराराचे उल्लंघन होत आहे असे मेहता यांचे म्हणणे आहे. परंतु २००४ मध्ये टाऊन पार्कसंदर्भात महासभेत झालेल्या ठरावावर खुद्द नरेंद्र मेहता यांनीच स्वाक्षरी केल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असून, नवी मुंबईतही सकारात्मक निर्णय होणार आहे. त्यामुळे मिरा भाईंदरमध्येही युती होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

वरिष्ठांच्या आदेशानंतर बैठक
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता शिवसेनेने ठेवलेला ठाणे पॅटर्नचा प्रस्ताव प्रदेश पातळीवर पाठवण्यात आला आहे; मात्र त्यावर प्रदेश नेत्यांकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर समन्वय समितीची पुढील बैठक होईल, असे मेहता यांनी सांगितले.
...........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com