शिवसेना-भाजप युतीचे त्रांगडे
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांची उद्या (ता. ३०)पर्यंतची मुदत शिल्लक राहिली आहे. त्यामुळे अखेर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी स्वतःचा अर्ज पक्षाच्या एबी फॉर्मशिवाय भरण्यास सुरुवात केली. शिवसेना-भाजप महायुतीचे त्रांगडे सुटलेला नाही, अशा परिस्थितीत वाशीतून माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी त्यांच्या प्रभागाचे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनीही त्यांच्या प्रभागाच्या उमेदवारीचे अर्ज दाखल केले. आज (ता. २९) रात्री युतीचे त्रांगडे सुटल्यानंतर उद्या एबी अर्ज मिळणार असल्याचे सांगितले जात असल्याने उमेदवारांची प्रतीक्षा सुरू राहणार आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत अद्याप महायुती, मविआ या एकमेकांना परस्पर विरोधी पक्षातील नेत्यांचे जागेचे सूत्र ठरत नाही. परिणामी अखेर उद्या घाई होण्यापेक्षा थेट प्रचाराला वेळ मिळावा, याकरिता भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. वाशीतून माजी नगरसेवक दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत आणि प्रती भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भगत यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने शिंदे गटाला दिलेल्या जागा कमी असून काही उमेदवारांना भाजपने विरोध केला आहे, तरी सुद्धा शिंदे गटाने ऐरोलीमध्ये त्या माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत भाजपने ठेवलेल्या अटी-शर्ती शिंदे गटाकडून पूर्ण होत नसल्याने अखेर दोन्ही पक्षांच्या नवी मुंबईतील नेत्यांकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले जात आहेत.
ऐरोली मतदारसंघातून शिंदे गटाच्या काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वाशीतून माजी नगरसेवक अनिल कौशिक यांनी त्यांचा मुलगा शार्दूल कौशिक यांचाही अर्ज दाखल केला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्जासोबत पक्षाचे एबी फॉर्म लावलेला नाही. कोपरखैरणेत भाजपच्या माजी नगरसेविका भारती पाटील आणि इतर तीन जणांनी भरलेले आहेत. किशोर पाटकर यांच्यासोबत माजी उपमहापौर अविनाश लाड आणि माजी नगरसेविका प्रणाली लाड यांनी उमेदवारी अर्ज भरले, तर माजी नगरसेविका दिव्या गायकवाड आणि वैभव गायकवाड हे दोघे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
भाजपच्या ‘त्या’ नगरसेवकांना विरोध
विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गणेश नाईक ऐरोलीमध्ये लढले होते, त्यावेळी त्यांच्याविरोधात बंडखोरी केलेले विजय चौगुले यांना शिवसेनेने पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. तसेच ठाकरे गटातून नाईकांविरोधात लढणारे एम. के. मढवी यांनाही शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. नाईकांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसोबत पॅनेलमध्ये भाजप निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती होईल, याची शक्यता धूसर झाल्याचे समजते.
विठ्ठल मोरे यांचा ठाकरे गटाला ‘रामराम’
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटाला ‘रामराम’ करीत भाजपमध्ये प्रवेश केला. ठाकरे गटातील जुने, माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्यामुळे मोठा फटका बसणार आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांना दहा जागा?
आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातून ४० जागा पक्षाकडे मागितल्या होत्या. त्यापैकी त्यांना दहा ते १२ जागा मिळणार असल्याचे समजते. या जागांवर जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील आणि निवडणूक प्रभारी डॉ. संजीव नाईक यांच्याकडून नावाची यादी प्रदेश नेतृत्वासमोर देण्यात आल्या आहेत. यावर आज उशिरा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
नवी मुंबईत आम्ही स्वबळावर निवडणूक लढत आहोत. भाजपकडे आम्ही दिलेला जागांचा प्रस्तावावर प्रदेशपातळीवर निर्णय होईल, तोपर्यंत ज्या ठिकाणी प्रश्न नाहीत, अशा ठिकाणी उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.
- किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना
शिवसेनेकडे भाजपने जो प्रस्ताव दिला होता, तो मान्य होत आला होता, मात्र भाजपने ज्या अटी-शर्ती ठेवलेल्या मान्य होत नसल्याने आता महायुतीचा निर्णय प्रदेशपातळीवरील नेत्यांवर होणार आहे.
- डॉ. संजीव नाईक, निवडणूक प्रभारी, नवी मुंबई भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

