जागावाटपाच्या तिढ्यात छोट्या पक्षांची अवहेलना
जागावाटपाच्या तिढ्यात छोट्या पक्षांची अवहेलना
बड्या पक्षांच्या साठमारीत लहान पक्षांचा बळी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीत बिघाडी झाली. जागावाटपाची घासाघीस अगदी शेवटपर्यंत सुरू होती. मोठ्या राजकीय पक्षांच्या या मारामारीत छोट्या-मोठ्या पक्षांची उपेक्षा झाल्याचे चित्र आहे. शेवटच्या क्षणी दगाफटका झाल्यामुळे मुंबईत महायुतीचा भाग असलेल्या रिपाइं (आठवले) गट तसेच डावे पक्ष, इतर रिपाइं गटांना आता स्वबळावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत.
कधी काळी मुंबईत आपले स्वतंत्र अस्तित्व असलेल्या आणि दलित मतांवर प्रभाव राहिलेल्या रामदास आठवले यांच्या पक्षाला भाजपने डावलल्याचे चित्र आहे. पक्षाने या वेळी भाजपकडे २५ जागांची मागणी केली होती. त्यातील १६ जागा आम्हाला सोडा. आमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील, असेही आठवले यांनी सांगितले. मात्र रिपाइंच्या नेत्यांना भाजपच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावून त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. शेवटी रिपाइंने ३८ जागांसाठी उमेदवार यादी जाहीर केले. अजूनही वेळ गेली नाही, रिपाइंची ताकद असलेल्या १० ते १२ जागांवर भाजप उमेदवारांनी माघार घेण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले. दुसरीकडे मुंबईत ‘वंचित’सह दोन्ही डाव्या पक्षांना सोबत घेण्याचे काँग्रेसने ठरवले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीला ६२ जागा सोडणाऱ्या काँग्रेसने या दोन्ही पक्षांना फारसे विचारात घेतले नसल्याचे कळते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी २० ते ३० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी काँग्रेसने ६ जागा सोडल्या होत्या; मात्र त्यातील काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरले होते. युती धोक्यात येताच काँग्रेस नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे ही युती वाचल्याचे समजते. दरम्यान, ‘डाव्या पक्षांनी मागितलेल्या बहुतांश जागा या वंचित आघाडीकडे गेल्या. त्यामुळे त्या जागा आम्हाला डाव्यासाठी सोडता आल्या नाहीत, अशी माहिती काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी दिली.
जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती आहे. कवाडे गटाने मुंबईत शिवसेनेकडे १० ते १५ जागांची मागणी केली होती; मात्र मुंबईत पक्षाच्या वाट्याला ९० जागा आल्यामुळे शिवसेनेने एकही जागा सोडली नाही. परिणामी कवाडे यांच्या पक्षाचे उमेदवार १५ जागांवर लढत आहेत. त्यातच मोठा गाजावाजा करीत एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत युती केली आहे; मात्र शिवसेनेने रिपब्लिकन सेनेला एकही जागा सोडली नसल्याचे समजते. त्यामुळे काही ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मुंबईत अस्तित्व व ताकद असलेल्या रामदास आठवले यांच्या पक्षाची भाजपने एका जागेवर बोळवण केली असताना मुंबईत फारसा प्रभाव नसलेल्या आनंदराज यांना जागा कशी सोडणार, असा सवाल शिवसेनेच्या एका नेत्याने केला.
रामदास आठवले यांनी सुमारे २० ते २२ जागांची मागणी केली होती. त्यांना पाच ते सहा जागा देण्यास महायुती तयार होती; मात्र त्यातही आठवले यांना विशिष्ट जागाच हव्या असल्यामुळे त्याबाबत एकमत होऊ शकले नाही. आता आठवले आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर अंतिम तोडगा निघेल.
- प्रवीण दरेकर, भाजप नेते
भाजपने रिपब्लिकन पक्षावर प्रचंड अन्याय केलेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ४० जागांवर रिपब्लिकन पक्ष मैत्रीपूर्ण लढत लढण्यास सज्ज आहे.
- रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
व्होट चोरीच्या आंदोलनानंतर काँग्रेस आमच्या संपर्कातच नाही. वाटाघाटी करताना आम्हाला विचारात घेतले नसल्यामुळे मार्क्सवादी पक्षाने मुंबईत २० जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत.
- अजित नवले, राज्य सचिव, माकप
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

