पालघर जिल्ह्यात जलसंधारण योजनांना गती

पालघर जिल्ह्यात जलसंधारण योजनांना गती

Published on

पालघर जिल्ह्यात जलसंधारण योजनांना गती
शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे पाणी उपलब्धता वाढणार; जिल्हाधिकाऱ्यांचा विश्वास
पालघर, ता. ३१ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या जलसंधारणाशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली. शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे जिल्ह्यातील जलसंधारण योजनांना गती मिळणार असून त्याचा थेट लाभ शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, उपजिल्हाधिकारी विजया जाधव, तसेच जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जलयुक्त शिवार अभियान, लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणना, जलसाठ्याची प्रगणना, प्रत्यक्ष स्थळपडताळणी, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण, तसेच जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ अंतर्गत ‘जल संचय, जन भागीदारी’ या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी फरीद खान यांनी योजनानिहाय प्रगतीचा सादरीकरणाद्वारे आढावा दिला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग व कृषी विभागामार्फत एकूण १३५२ कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी उर्वरित कामांची गती वाढवण्याचे निर्देश दिले.
...............
जलयुक्त शिवारअंतर्गत २२६० कामे पूर्ण
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत इतर योजनांतून १४७१ तर विशेष निधीतून ७८९ अशी एकूण २२६० कामे पूर्ण झाली आहेत. कामांची गुणवत्ता राखून नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्तता करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणना व जलसाठा प्रगणना अंतर्गत १००९ गावांमध्ये काम सुरू असून, प्रत्यक्ष स्थळपडताळणी योजनेंतर्गत २८, ५३९ कामांपैकी ११, २११ कामांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. तसेच गाळमुक्त धरण व नाला खोलीकरण योजनेंतर्गत १६, ५२० घनमीटर गाळ काढण्यात आला असून तलासरी तालुक्यातील अनवीर दाभाडेपाडा नाल्याचे काम पूर्ण झाले आहे.
................
‘जल संचय, जन भागीदारी’ला व्यापक सहभागाचे आवाहन
‘कॅच द रेन’ मोहिमेअंतर्गत ३१ मेपर्यंत पूर्ण झालेल्या सर्व जलसंधारण कामांची माहिती पोर्टलवर वेळेत अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी उपलब्धता वाढवून दीर्घकालीन लाभ देणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत, सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास पालघर जिल्हा जलव्यवस्थापनात आदर्श ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com