उलवेतील एसटीपीमधून दूषित पाणी नाल्यात
उलवेतील एसटीपीमधून दूषित पाणी नाल्यात
सिडकोचे दुर्लक्ष; दुर्गंधी, रोगराईचा धोका वाढला
उलवे, ता. १ (बातमीदार) : उलवे परिसरातील घराघरातून निघणारे सांडपाणी शुद्ध करून नाल्यात सोडण्यासाठी सिडको महामंडळाने उभारलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) सध्या पूर्णतः निकामी अवस्थेत असून, स्वच्छ पाण्याऐवजी केमिकलयुक्त व घाणमिश्रित दूषित पाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी उलवेतील रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बामणडोंगरी रेल्वेस्थानकाजवळील उलवे सेक्टर ६ येथे सिडकोने काही वर्षांपूर्वी एसटीपी प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सांडपाणी शुद्धीकरण करून निर्जंतुक पाणी नाल्यात सोडणे हा होता. मात्र सध्या या प्रकल्पातील पाणी शुद्धीकरण व निर्जंतुकीकरणाची महत्त्वाची यंत्रणा बंद पडली आहे. काही यंत्रे केवळ नावापुरती सुरू असून, वर्षानुवर्षे कंत्राटदाराकडून आवश्यक देखभाल व दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
यामुळे इमारतींमधून निघणारे सांडपाणी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता थेट नाल्यात विसर्जित केले जात आहे. या पाण्यावर फेस येत असून, असह्य दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात हे पाणी वाहून जात होते; मात्र आता हिवाळ्यात दुर्गंधी अधिक तीव्र होत असल्याने परिसरात राहणे कठीण झाले आहे. दुर्गंधीबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढत असून त्वचारोग, श्वसनाचे आजार व साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी अनेकदा सिडको प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या; मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. सिडकोचे कार्यकारी अभियंता धांडे यांच्याशी संपर्क साधला असता, एसटीपी प्रकल्पासाठी नवीन सल्लागार नेमण्यात आला असून, लवकरच आवश्यक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
चौकट
आरोग्याचा प्रश्न गंभीर
एसटीपी प्रकल्पातून सोडले जाणारे दूषित पाणी हा केवळ अस्वच्छतेचा प्रश्न नसून, थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्दा बनला आहे. मानकांनुसार प्रक्रिया न झालेल्या पाण्यामुळे नाल्यांमधून दूषित घटक परिसरात पसरत असून, भविष्यात मोठ्या आरोग्य संकटाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटीपी प्रकल्पाची तातडीने तांत्रिक व गुणवत्ता नियंत्रण तपासणी करून दूषित पाण्याचा विसर्ग त्वरित थांबवावा आणि केवळ प्रक्रिया झालेले, निर्जंतुक पाणीच नाल्यात सोडावे, अशी जोरदार मागणी अनंत टॉवर रहिवासी संघासह उलवेतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोट
हा प्रश्न केवळ दुर्गंधी किंवा अस्वच्छतेपुरता मर्यादित नसून, थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. एसटीपी प्रकल्पातील गंभीर तांत्रिक निष्काळजीपणा यास कारणीभूत आहे. वेळीच उपाय न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
- अजय हेगडकर, अध्यक्ष, सिडको हक्क संघर्ष समिती, उलवे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

