निवडणुकीच्या लगबगीत स्वच्छतेचे तीन तेरा

निवडणुकीच्या लगबगीत स्वच्छतेचे तीन तेरा

Published on

निवडणुकीच्या लगबगीत स्वच्छतेचे तीनतेरा
वसई-विरार शहरात कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक त्रस्त

वसई, ता. ३ (बातमीदार) : कचरामुक्त शहर, स्वच्छ मोहीम असे नारे दिले जात असले तरीही वसई-विरार शहरात कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे. सध्या पालिका निवडणुकीच्या लगबगीत अधिकारी व्यस्त असल्याने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी दिवसातून दोनदा साफसफाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
वसई-विरार शहरातून दैनंदिन ७०० टन कचरा जमा होत असून वसई पूर्वेकडील क्षेपणभूमीवर नेला जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी शहरात सार्वजनिक भागात व गृहसंकुलात कचराडब्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे; परंतु यातील अनेक डबे हे नादुरुस्त झाले आहेत. शहरातील निवासी संकुल परिसराच्या ठिकाणी कचरा कुठेही फेकला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढीग निर्माण होत आहेत. त्यामुळे दुर्गंधी, डासांची उत्पत्ती वाढू लागली आहे.
वसई-विरार शहर महापालिकेच्या क्षेत्रातील सोपारा गाव, गास मार्ग, माणिकपूर, पेल्हार, तुळींज, संतोष भवन, धानीव बाग, विरार-नालासोपारा मार्ग, मनवेल पाडा, टाकीपाडा यासह अनेक भागात रस्त्याच्या कडेला व नागरी वस्तीत कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
एकीकडे स्वच्छता ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबवले जातात. नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहनही केले जाते; मात्र तरीही शहरातील अनेक भागांत मोकळ्या जागेत कचरा दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
वसई-विरार शहरातील नागरी वस्ती भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. यात खाद्यपदार्थाचे वेष्टन, पिशव्या, घरातील अनावश्यक वस्तू, साहित्य तसेच अन्य कचऱ्याचा समावेश आहे. नाल्याच्या, गटाराच्या कडेलादेखील कचरा जमा होत आहे. पदपथावरदेखील कचरा टाकला जात आहे.
शहरातील कचरा सकाळच्या सुमारास महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून उचलला जात असला तरी पुन्हा कचऱ्याचे ढीग निर्माण होत असतात. ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तसेच असतात, त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरते.


प्लॅस्टिकचा खच

एकीकडे प्लॅस्टिक पिशव्या वापरू नये, असे आवाहन केले जात असले तरी वसई-विरार शहरात कचऱ्यांमध्ये प्लॅस्टिकचा समावेश दिसून येत आहे, त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास केला जात असल्याचे यावरून स्पष्ट होते.


महापालिका कर्मचारी शहराची दररोज साफसफाई करीत असले तरी वसईतील अनेक भागांत पुन्हा कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे दिवसातून दोनदा स्वच्छता करणे गरजेचे आहे, त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव होणार नाही.
- हाजी पटेल, नागरिक, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com