नवी मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला

Published on

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला
निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा एकदा दुर्लक्षित
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : विचारधारा, निष्ठा, तळागाळातील कार्यकर्त्यांचे योगदान, या संकल्पना केवळ भाषणापुरत्या मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्षात राजकारण ठराविक घराण्यांच्या चौकटीत अडकले असल्याची तीव्र भावना शहरातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला दिसून येत असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी याद्यांकडे पाहता सुमारे ५० टक्के तिकीटे विद्यमान किंवा माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांनाच देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता” या उक्तीप्रमाणेच आजचे स्थानिक राजकारण चालत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत असून, अनेक वर्षे पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते यावेळीही दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे. सध्याच्या राजकारणात आयाराम-गयाराम संस्कृती बळावत असताना, सामान्य कार्यकर्त्यांची भूमिका केवळ नेत्यांच्या मागे उभे राहणे, प्रचारात झटणे आणि घोषणा देण्यापुरती मर्यादित ठेवली गेल्याचे चित्र आहे. एकदा सत्ता हातात आली की ती टिकवण्यासाठी कुटुंबीयांनाच संधी देण्याचा मोह अनेक नेत्यांना आवरत नसल्याचे वास्तव आहे. नवी मुंबईत यापूर्वीही एका घरात मंत्रीपद, आमदारकी आणि महापौरपद अशी सत्ता केंद्रित झाल्याची उदाहरणे नागरिकांनी पाहिली आहेत. त्याच पद्धतीचा कित्ता यंदाही गिरवला जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक केवळ पक्षांतील राजकीय लढत न राहता “घराणेशाही विरुद्ध सामान्य कार्यकर्ता” अशी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत नवी मुंबईकर मतदार घराणेशाहीला नकार देतात की पुन्हा एकदा त्यालाच संधी देतात, याकडे केवळ शहराचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
...............
कार्यकर्त्यांचा बंडाचा पवित्रा
आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या पक्षांनी मिळून सुमारे २४ नगरसेवकांच्या कुटुंबियांना तब्बल ५८ उमेदवारीची तिकीटे दिली आहेत. यामध्ये काही घराण्यांना तीन ते चार तिकीटे देण्यात आली असून, तर अनेक घराण्यांना प्रत्येकी दोन तिकीटे देण्यात आली आहेत. घराणेशाहीवर सातत्याने टीका करणाऱ्या पक्षांनीच प्रत्यक्षात ती जोपासल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, घराणेशाहीचा आरोप इतरांवर करणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने स्वतःच्या उमेदवारी याद्यांमधूनच घराणेशाहीला खतपाणी घातल्याचे दिसून येते. पत्नी, मुले, पुतणे, सून यांना प्राधान्य देण्यात आल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून काहींनी पक्षांतर करून उमेदवारी मिळवली आहे.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com