आसुफ येथे श्रमदानातून उभारला वनराई बंधारा
आसुफ येथे श्रमदानातून उभारला वनराई बंधारा
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार; जलसाठ्यात वाढ होणार
श्रीवर्धन, ता. ५ (बातमीदार) ः श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून कृषी विभागाच्या पुढाकारातून आसुफ गावाच्या हद्दीतील नाल्यावर श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ होणार असून शेती, पशुधन तसेच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
आसुफ गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र स्वरूप धारण करते. विहिरी व बोअरवेल कोरडे पडत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी पंकज पाटील यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाच्या वनराई बंधारा योजनेअंतर्गत नाले, ओढे व नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी बंधारे उभारून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. या वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून ठेवले जाणार असून भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी परिसरातील विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी संरक्षित पाणी उपलब्ध होणार आहे. यासोबतच पशुधन, जंगलातील वन्यप्राणी तसेच गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य जयंत राजाराम सावंत, पोलिस पाटील संदेश कृष्ण दरेकर, सहाय्यक कृषी अधिकारी पंकज पाटील यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी मिळून केलेल्या सामूहिक प्रयत्नातून हा बंधारा अल्प कालावधीत पूर्ण करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी पंकज पाटील यांनी सांगितले की, श्रमदानातून उभारलेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे आसुफ परिसरात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असून इतर गावांनीही याचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत करत कृषी विभागाच्या या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
................................
चौकट :
वनराई बंधाऱ्याचे फायदे
पावसाचे पाणी अडवून जलसाठ्यात वाढ
भूगर्भातील पाण्याची पातळी टिकविण्यास मदत
शेती, गोधन व वन्यजीवांना पाणी उपलब्ध
उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होण्यास हातभार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

