एमआयडीसी निवासीतील नागरिक मतदानावर टाकणार बहिष्कार
सांडपाणी आणि विषारी वायूचा दुहेरी विळखा
एमआयडीसीतील नागरिकांचा निवडणूक बहिष्काराचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ ः डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील नागरिक मागील दोन महिन्यांपासून गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. शौचालयातील मलमूत्रातून तीव्र दुर्गंधी आणि एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून येणाऱ्या विषारी वायूंचा उग्र वास, या दुहेरी त्रासामुळे रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रशासनाकडून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर येथील नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
डोंबिवली एमआयडीसी फेज दोनच्या अगदी लगत असलेल्या निवासी परिसरात ओम सदिच्छा, ओमकार छाया, माणिकरत्न आणि गौरी नंदन या चार गृहनिर्माण वसाहती आहेत. या चारही इमारतींमध्ये सुमारे ४८ कुटुंबे वास्तव्यास असून अंदाजे २०० ते २५० मतदार या परिसरात आहेत. या भागात पावसाळी गटारामधून मागील दोन महिन्यांपासून थेट शौचालयाचे मलमूत्र वाहत असून त्यातून तीव्र वास येत आहे. त्याचबरोबर शेजारील रासायनिक कंपन्यांतून अधूनमधून सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूंमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक रहिवाशांनी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पालिका तसेच एमआयडीसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. एमआयडीसी आणि पालिका अधिकाऱ्यांनी पाहणीही केली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवासी राजू नलावडे यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता शेवटचा उपाय म्हणून महापालिका निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
येथील माणिकरत्न सोसायटी मधील राहिवासी रामदास मेंगड म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून आमच्या इमारतीसमोरील पावसाळी गटारातून थेट शौचालयाचे सांडपाणी वाहत आहे. त्याचवेळी जवळील रासायनिक कंपन्यांतून विषारी वायू सोडले जात असल्याने दुहेरी उग्र वासाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आमची झोप उडाली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना सांगूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आता शेवटचा पर्याय म्हणून महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे .
निवडणुकीवर परिणाम होणार
दरम्यान, हा परिसर प्रभाग क्रमांक १९ च्या पॅनलमध्ये येत असून अ, ब आणि क हे तीनही वार्ड बिनविरोध झाले आहेत. तर ड वार्डसाठी भाजप आणि मनसे यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र, समस्यांचे निराकरण न झाल्यास येथील सुमारे दोनशे ते अडीशे मतदार मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याने या निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

