उरणकरांना अशुद्ध पाणी पुरवठा
उरणकरांना अशुद्ध पाणी पुरवठा
नगराध्यक्ष भावना घाणेकर यांचा गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
उरण, ता. ७ (वार्ताहर) : उरण शहरात अनेक मूलभूत नागरी समस्या प्रलंबित असतानाच आता नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या दुर्लक्षेमुळे व आडमुठ्या धोरणामुळे उरण शहरातील नागरिकांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील विविध समस्या जाणून घेत असताना अनेक नागरिकांनी दूषित पाण्याचे नमुने नगराध्यक्षांकडे सादर केले. त्यानंतर शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान काही टाक्यांमध्ये बेडूक तसेच इतर घाणेरड्या वस्तू आढळून आल्या. किमान पंधरा वर्षांपासून या टाक्यांची योग्य प्रकारे स्वच्छता करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नगराध्यक्ष घाणेकर यांनी केला. या संदर्भात मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अत्यंत उद्धट व अरेरावीची भूमिका घेत तुम्हाला कोणता अधिकार आहे पाणी अशुद्ध ठरविण्याचा?, असे तडकाफडकी उत्तर दिल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला. प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने अखेर या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. याचवेळी नगराध्यक्षांनी शहरातील कचरा व्यवस्थापनाचाही मुद्दा उपस्थित केला. बोरी येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नसून तेथे किडे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराकडून कचरा उचलण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असून मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यात संगनमत सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी यावेळी आणखी काही गोप्यस्फोट करत पुढील काळात नगरपरिषदेच्या सर्व सभा व बैठका थेट (लाईव्ह) प्रसारित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
.................
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्याधिकारी समीर जाधव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्यावरील आरोप खोटे आहेत. प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहे. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता कोविड काळात, माझ्या कार्यकाळातच करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यामुळे प्रकरणामुळे उरण शहरातील पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर राजकीय व प्रशासकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

