काँग्रेसची माघारी शिंदे गटाच्या पथ्यावर
शिंदे गटाच्या विजयाला ‘काँग्रेस’चा हात?
ठाण्यात पाच ठिकाणी माघार; महाविकास आघाडीतील बिघाडीचा महायुतीला फायदा
ठाणे, ता. ८ : ठाणे महापालिका निवडणुकीत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, अर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, मनसेनेही प्रशासनावर पक्षपातीपणाचे आरोप करीत ही निवडणूक लढाई थेट राज्य निवडणूक आयोगाच्या दारात नेली आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची पुनर्बांधणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सुरू केले होते. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच मनसे यांच्यात समन्वय साधून एकत्रित निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू होती. मनसे आणि ठाकरे गटातील मनोमिलनामुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत झाल्याचे संकेत मिळत होते. अशातच १३१ जागांसाठी महाविकास आघाडीत जागावाटपावरून खालबते सुरू असताना, काँग्रेसने ठाणे महापालिकेत ३५ ते ४० जागांची मागणी केली होती; मात्र या मागणीवर एकमत न झाल्याने काँग्रेसने अखेर महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तब्बल ९५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा दावा केला होता; प्रत्यक्षात मात्र अर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसच्या पाच उमेदवारांनी अचानकपणे आपले अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या माघारीमुळे संबंधित प्रभागांमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, काँग्रेसच्या या निर्णयामुळे अप्रत्यक्ष शिंदे गटाला फायदा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बिनविरोध विजय
प्रभाग १८ (क) मधून वैशाली पवार यांनी माघार घेतल्याने सुखदा मोरे आणि १८ (ड) मधून अजित पवार यांनी माघार घेतल्याने राम रेपाळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर प्रभाग १९ (क) मध्ये विकास रेपाळे यांच्यासमोरून महेश सुळे, १७ (ब) मधून आरती पोटफोडे आणि प्रभाग १७ मधून रमेश जाधव यांनी अर्ज मागे घेतल्याने शिंदे सेनेचे पारडे जड झाले आहे.
काँग्रेसची अंतर्गत पडझड
ठाणे काँग्रेसमध्ये सध्या मोठी अस्वस्थता दिसत आहे. पक्षाचे प्राबल्य असलेल्या प्रभाग ५ (अ), ६ (ड) आणि ९ (ड) मध्ये काँग्रेसने उमेदवारच दिलेले नाहीत. त्यातच २०१७चे काँग्रेसच्या नगरसेवक दीपाली भगत आणि यासिन कुरेशी यांनी तुतारी हाती घेतल्याने काँग्रेसची ताकद पूर्णतः क्षीण झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. हा विजय म्हणजे उपमुख्यमंत्र्यांवरील जनतेचा विश्वास आहे, असे शिंदे सेनेकडून सांगण्यात येत असले, तरी राजकीय वर्तुळात मात्र याला ‘काँग्रेसची छुपी मदत’ असे संबोधले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

