रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ

Published on

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ
समृद्ध पंचायतराज अभियानात तीन महिन्यांत ९०.७७ कोटींची वसुली
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या अभियानाचा सकारात्मक परिणाम घरपट्टी वसुलीवर दिसू लागला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या थकबाकी वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तब्बल ९० कोटी ७७ लाखांची वसुली झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या वाढीव वसुलीमुळे ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास तसेच विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.
घरपट्टीची मोठी थकबाकी असल्याने विशेष कॅम्पचे आयोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. सोमवारी व शनिवारी असे दोन दिवस घरपट्टी भरण्यासाठी कॅम्प चालविण्याच्या सूचनांनंतर नागरिक व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. अभियानादरम्यान १३ डिसेंबर लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात २७ हजार ३४१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी आठ हजार ३१६ प्रकरणांचा तातडीने निपटारा होऊन सहा कोटी ८० लाख १४ हजार ९६३ रुपये वसूल करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या पुढाकारामुळे समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना महसूलवाढीद्वारे अधिक सक्षम करण्यावर भर राहिला. वाढीव घरपट्टी वसुलीमुळे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आदी मूलभूत सुविधा तसेच लोकहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्य होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.


पाणीपट्टी वसुलीतही वाढ
एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान ५०.५६ टक्के पाणीपट्टी वसुली झाली असून समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे नऊ कोटींची वाढ झाली आहे. लोकअदालतीमध्ये पाणीपट्टीची सहा हजार ६८९ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी एक हजार ४७४ प्रकरणांचा निपटारा करून एक कोटी १४ लाख ४१ हजार ५५० रुपये वसूल झाले.


जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तब्बल ६२ टक्के घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे घरपट्टी वसुलीला गती मिळाली आहे. अभियानाची मुदत आता ३१ मार्चपर्यंत वाढली असून हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे पुढील तीन महिन्यांत ही वसुली किमान ९० टक्क्यांपर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतींनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतींना घरपट्टी भरून सहकार्य करावे.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com