नागरी प्रश्न प्रचारातून गायब
नागरी प्रश्न प्रचारातून गायब
आरोप-प्रत्यारोप, भावनिक मुद्द्यांवर प्रचार
विष्णू सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई , ता. ११ : प्रदूषण, रस्त्यांची दुरवस्था, रखडलेले पाणीपुरवठा प्रकल्प, बंद पडणाऱ्या मराठी शाळा, आरोग्य सुविधेचे खासगीकरण आणि वाताहत, धारावी स्थलांतर, डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी असे प्रश्न मुंबई महापालिकेच्या प्रचारातून गायब झाल्याचे चित्र आहे. प्रमुख राजकीय पक्षही या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहात नसल्याचे दिसत नाही, फक्त आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक मुद्दे मांडले जात असून, शहरातील प्रश्न फक्त जाहीरनाम्यापुरते मर्यादित राहिले आहेत. एकंदरीत मुंबईकरांना भेडसावणारे नागरी प्रश्न प्रचारातून गायब झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबईचा महापौर हिंदू होणार की मुस्लिम, मराठी की उत्तर भारतीय यावरून राजकीय पक्षात जुंपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार मूळ नागरी प्रश्नांपासून दूर गेला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे गेल्या काही वर्षांत रणकंदन माजले आहे. तिथल्या नागरिकांना आपली घरे, व्यवसाय वाचेल की नाही याची चिंता आहे. या ठिकाणी विविध व्यवसायांमुळे समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. त्याचा मुंबईच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागत आहे. मात्र पुनर्विकासामुळे तेथील नागरिकांना चिंता सतावत आहे. येथील नागरिकांचे मुलुंड येथे पुनर्वसन केले जाणार आहे; मात्र मुलुंडकरांचा याला विरोध आहे. हा मुद्दा मात्र प्रचारात दिसत नाही. मुंबईकरांना दररोज वाहतूक कोंडीशी सामना करावा लागतो. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. वाढती वाहने आणि पार्किंगची समस्या गंभीर होत आहे. याकडे सर्वच राजकीय पक्षांनी कानाडोळा केला आहे. दुसरीकडे मुंबईतील सर्वच विभागांत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काँक्रीटीकरणाची कामे रखडली आहेत. मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याची घोषणाही घोषणाच राहिली आहे. पालिकेच्या मराठी शाळा बंद होताहेत. रुग्णालयांचे खासगीकरण होत आहे. आरोग्याचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे हे प्रश्न फक्त जाहीरनाम्यापुरते मर्यादित राहतात. त्यामुळे मुंबईकरांना दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्यांवर कोणताही पक्ष बोलत नसल्याचे दिसते.
महापालिका निवडणुका भावनिक प्रश्नांवर लढल्या जात आहेत. आपण नागरिक म्हणून भूमिका घ्यायला हवी. मतदार म्हणून आपण सजग नाही. मराठी भाषेची, मराठी शाळांची दुरवस्था याबद्दल मतदार प्रश्न विचारत नाहीत. महापालिका आणि राज्य सरकार रुग्णालयांचे खासगीकरण का करीत आहे? कोस्टल रोडसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे, मात्र मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा केला जात आहे. याचा मुंबईकरांनी विचार करायला हवा.
- सीताराम शेलार, कार्यकारी संचालक, सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॅसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

