

व्हीप न मानल्यास सहा वर्षे अपात्र
राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा
अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेतील सत्तासंघर्षाने पुन्हा नवे वळण घेतले आहे. सोमवारी होणाऱ्या उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही नगरसेवकांना व्हीप बजावून भाजप समर्थित उमेदवाराला मतदान करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. व्हीपचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांवर सहा वर्षांची अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजपने रविवारी (ता. ११) दिला. दरम्यान, शिवसेनेने हा व्हीप बेकायदा असल्याचे म्हटले आहे.
अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजित करंजुले-पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते म्हणाले, की अंबरनाथ विकास आघाडीचे सर्व ३२ सदस्य व्हीपला कायदेशीर बांधील आहेत. यामध्ये भाजपचे १४, भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, अपक्ष नगरसेवक तसेच नगराध्यक्ष यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही सदस्याने पक्षीय शिस्त मोडल्यास कायद्याने कठोर कारवाई अटळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. या वेळी आमदार किसन कथोरे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील, भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, माजी शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले-पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अभिजित करंजुले-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सदाशिव पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करून गट स्थापनेवेळी त्यांनी भाजपप्रणीत आघाडीला समर्थन दिल्याचा दावा केला. या वेळी नगरसेवक प्रदीप पाटील यांनी सदाशिव पाटील यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला.
२० डिसेंबरला झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आला असला तरी काेणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपने काॅँग्रेस, राष्ट्रवादी काॅँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकाला बराेबर घेऊन ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली; मात्र राष्ट्रवादी काॅँग्रेसचे चार नगरसेवक २७ सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेकडे झुकल्याने भाजपचे सत्ता स्थापनेचे गणित बिघडले आहे.
----
‘व्हीप’ बेकायदा : किणीकर
शिवसेनेचे आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांनी हा व्हीप बेकायदा असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. सदाशिव पाटील यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन आपण अंबरनाथ विकास आघाडीत सामील नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आघाडीने बजावलेला व्हीप या नगरसेवकांना लागू होणार नाही. अंबरनाथ विकास आघाडी हा व्हीप रद्द झाल्याने कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाला लागू होत नाही. त्यामुळे आमच्याकडे ३२ नगरसेवकांचे भक्कम संख्याबळ असल्याचा दावा डॉ. किणीकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.