भुयारी मार्गाची मागणी
भुयारी मार्गाची मागणी
वाणगाव रेल्वे उड्डाणपूल नागरिकांसाठी गैरसोयीचा
तारापुर, ता. ३१ (बातमीदार) : वाणगाव येथील पश्चिम रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेला उड्डाणपूल नागरिकांच्या दृष्टीने सोयीऐवजी गंभीर अडचणी निर्माण करणारा ठरत असल्याचे स्थानिकांचे मत आहे. या नागरी समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व संबंधित ठिकाणी भुयारी मार्ग मंजूर करावा, अशी मागणी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वाणगावच्या पश्चिम भागात बाजारपेठ, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, बँका तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, वाणगावच्या पूर्व भागात आदिवासी समाजाची मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असलेली गावे असून, या भागातील नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सध्या उड्डाणपुलावरून तब्बल एक ते दोन किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाली आहे. उड्डाणपुलावर बांधण्यात आलेला जिना सदोष व अपुरा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती, हृदयरोगी, दम्याचे रुग्ण, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना या पायऱ्या चढणे-उतरणे अत्यंत कष्टदायक आणि धोकादायक ठरत आहे. परिणामी नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. या समस्येचा सर्वाधिक फटका आरोग्य सेवांवर होत असल्याचेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्पदंश, विषबाधा, अपघातग्रस्त रुग्ण तसेच गरोदर महिलांना वाणगाव पूर्व भागातील गावांतून ग्रामीण रुग्णालय, वाणगाव येथे वेळेत पोहोचविणे अवघड होत आहे. उड्डाणपुलामुळे वाढलेले अंतर आणि जिन्याच्या अडचणींचा थेट परिणाम रुग्णांच्या उपचारांवर होत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने काही रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर वाणगाव ग्रामीण रुग्णालयासमोरून वाणगाव पूर्व व पश्चिम भाग थेट जोडणारा भुयारी मार्ग तातडीने मंजूर करून उभारण्यात यावा, अशी मागणी आदिवासी एकता परिषदेने केली आहे. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वाणगाव परिसरातील ही गंभीर नागरी समस्या तातडीने सोडवून नागरिकांना सुरक्षित, सोपा आणि थेट दळणवळणाचा मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

