टोकराळेत टेक्सटाईल पार्कविरोधात जनआक्रोश

टोकराळेत टेक्सटाईल पार्कविरोधात जनआक्रोश

Published on

टोकराळेत टेक्सटाईल पार्कविरोधात जनआक्रोश
तीव्र विरोध करत ग्रामस्थांनी कंटेनर माघारी धाडले

पालघर, ता. ३ (बातमीदार) : पालघरमधील माहीम टोकराळे येथे प्रस्ताविक असलेल्या टेक्सटाईल पार्क प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यातील कामास स्थानिक ग्रामस्थांसह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सोमवारी (ता. १) या प्रकल्पासाठी कंटेनर केबिन कार्यालय आणले जाणार असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली करत संबंधित ट्रक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अडवून धरले. ज्यामुळे काही काळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
आंदोलकांनी ठाम भूमिका घेतल्याने अखेर प्रकल्प अधिकाऱ्यांनी हे कंटेनर माघारी नेले. सध्या हे कंटेनर केबिन ट्रक पालघर-माहीम महामार्गालगत उभे करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारपासून संध्याकाळपर्यंत आंदोलक घटनास्थळी ठाण मांडून बसले होते. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, अखेर हे सर्व कंटेनर परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सर्वांच्या एकजुटीचा विजय असून, प्रकल्पविरोधी संघर्षाचा हा पहिला टप्पा असल्याचे आंदोलकांनी सांगितले. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे, काही ग्रामस्थांनी या प्रकल्पाची बाजू घेतली आहे. विकासाला विरोध करू नका. टेक्सटाईल पार्क उभे राहिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत त्यांनी मांडले. तसे असले तरी, बहुसंख्य आंदोलक ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध करत पर्यावरण नष्ट करणारे प्रकल्प आम्हाला नकोत, अशी ठाम भूमिका घेतली आहे. पर्यावरणाचा नाश करून होणारा तथाकथित विकास दीर्घकाळ टिकणारा नसून जमीन, पाणी व हवा प्रदूषित झाल्यास शेती, मासेमारी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
----------
चौकट
अनेक जबाबदार व्यक्तींचे मौन

पर्यावरण दक्षता समिती अस्तित्वात असतानाही माहीम, केळवे, कमारे आदी भागांतील अनेक जबाबदार व्यक्तींनी मौन बाळगल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. हा लढा कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून गावाच्या अस्तित्वासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित जमीन हवी असेल, तर आजच आवाज उठवणे गरजेचे आहे. आज गप्प बसलो, तर उद्या बोलायला काहीच उरणार नाही. आम्हाला विकास हवा आहे, पण विनाश नको, असा ठाम संदेश देत ग्रामस्थांनी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com