आपत्तीकाळात पालिकेचे संकटमोचक
आपत्तीकाळात पालिकेचे संकटमोचक
मिरा-भाईंदरमध्ये प्रतिसाद दल, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची निवड
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) धर्तीवर मिरा-भाईंदर पालिका आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करणार आहे. यासाठी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार असून, आपत्तीकाळात पालिकेचे संकटमोचक तैनात राहणार आहेत.
देशात एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास एनडीआरएफचे पथक बचाव कार्य सुरू करते. या कामासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले असते. राज्यातही याच धर्तीवर पथकाची स्थापना झालेली आहे. त्याच अनुषंगाने काही महापालिकांनी स्वतःचे आपत्ती प्रतिसाद दल स्थापन केले आहे. मिरा-भाईंदर महापालिकेनेदेखील अशाच प्रकारचे आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
----------------------------------------------------
अग्निशमन दलाला मदत
- मिरा-भाईंदर पालिकेचे अग्निशमन दल शहरालगतही आपत्तीच्या काळात धावून गेले आहे. काही वर्षांपूर्वी मंत्रालयात लागलेल्या आगीच्या घटनेत मिरा भाईंदरच्या अग्निशमन दलाची टर्न टेबल लॅडर ही बहुमजली इमारतींसाठी वापरण्यात येणारी गाडी पाचारण करण्यात आली होती.
- ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेतील बसला चेणा नदी येथे झालेल्या अपघातावेळी महापालिकेच्या अग्निशमन दलाचा मदतकार्यातील सहभाग उल्लेखनीय होता. तर नुकत्याच भाईंदर पूर्व भागात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेकांचे प्राण वाचवले होते.
----------------------------------
मिरा-भाईंदरमध्ये पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती त्याचप्रमाणे शहरात असलेल्या जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीत लक्षात आपत्ती प्रतिसाद दल उपयुक्त ठरणार आहे. यासाठी अग्निशमन दलातील निवडक अधिकारी, कर्मचाऱ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- डॉ. सचिन बांगर, उपायुक्त, मिरा-भाईंदर पालिका

