कुंभमेळ्यासाठी निधी वर्षाव
कुंभमेळ्यासाठी निधीचा वर्षाव
पालघर-घोटी महामार्गासाठी ३,३२० कोटींची तरतूद
पालघर, ता. १७ ः पालघर-नाशिक-सिन्नर-घोटी १६० ‘अ’ राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने तब्बल ३,३२० कोटींचा निधी मंजूर केला आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, तसेच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या दळणवळण सक्षमीकरणासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असून, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्ट्यातील ग्रामीण भागांचा विकास वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
कुंभमेळा, वाढवण बंदर, पर्यटन आणि ग्रामीण विकास या सर्व घटकांना चालना देणारा हा निर्णय असून, राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पाच ते सात वर्षांपूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला. मात्र, त्याच्या सुधारणेसाठी मंजुरी मिळाली नव्हती. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण मिळत होते, पण नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते मूलभूत पायाभूत सुविधा उभारणीसाठी राज्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या महामार्गाच्या सुधारणेला केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. १६० ‘अ’ राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण होणार असून, आवश्यक नवीन पूल, उड्डाणपूल उभारणी होणार आहे, तर कुंभमेळा काळात वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन सुलभ मार्गरचना होणार आहे. तसेच वाढवण बंदराकडे जाणाऱ्या मालवाहतुकीसाठी सक्षम सुविधा उभारली जाणार आहे.
-------------------------------------------
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
- नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान देशभरातून लाखो भाविक दाखल होतात. या काळात वाहतूक कोंडी, अपघातासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतात. पालघर, वाडा, सिन्नर, घोटी मार्गे नाशिकपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाला मोठी मदत होणार आहे. पालघर जिल्ह्यात उभारण्यात येणारे वाढवण बंदर भविष्यातील मोठे आर्थिक केंद्र मानले जात आहे.
- बंदराशी जोडलेला सक्षम रस्ता हा उद्योग, निर्यात-आयात आणि मालवाहतूक यासाठी अत्यावश्यक घटक आहे. या महामार्गाच्या उन्नतीकरणामुळे वाढवण बंदरातून नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक पट्ट्यांपर्यंत मालवाहतूक अधिक जलद, खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. महामार्ग तयार झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होऊन स्थानिकांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
------------------------------
रोजगारनिर्मितीला चालना
पालघर, वाडा, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, घोटी अशा अनेक ग्रामीण आदिवासी भागांना हा महामार्ग जोडतो. सुधारित महामार्गामुळे कृषी उत्पादनांची बाजारपेठेपर्यंत जलद वाहतूक होणार आहे. पर्यटनस्थळांपर्यंत सहज पोहोचता येणार असून, रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
-------------------------
व्यावसायिकांना फायदा
पालघर, मोखाडा, जव्हार, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी परिसरातील निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन आणि डोंगरी पर्यटनासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. सुधारित रस्त्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा स्थानिक व्यावसायिकांना होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

