डहाणू किनाऱ्यावर वाळू चोरीचा हैदोस;
वाळू चोरांपुढे प्रशासन हतबल
जिल्ह्यातील किनाऱ्यांच्या सुरक्षेला धोका
कासा, ता. १७ (बातमीदार) : डहाणू तालुक्याला लाभलेला समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण राहिला आहे. या किनाऱ्यांमुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळत असताना, दुसरीकडे बेकायदा वाळू चोरीचे प्रकार थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे पर्यावरणच धोक्यात आले आहे.
डहाणू तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. किनाऱ्यालगत मोठमोठे खड्डे पडले आहेत. जमिनीची झीज वेगाने वाढत असून, समुद्रकिनारे अधिकच धोकादायक बनत चालले आहेत. ग्रामस्थांच्या मते, भविष्यात मोठ्या भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी थेट गावात व रस्त्यांवर शिरून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चिखले ग्रामपंचायतीने घोलवड पोलिस ठाणे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन देऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच चिखले समुद्रकिनाऱ्यावरून दररोज १० ते १२ वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे, सागरी पोलिस चौकी समोरूनच ही बेकायदा वाहतूक होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.
----------------------------------
किनाऱ्याची झपाट्याने धूप
वाळू चोरीमुळे समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या वेळी सुरू बाग उन्मळून पडत असून, किनाऱ्याची धूप झपाट्याने वाढत आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचे साठेही खारट होत चालल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वाळू चोरी रोखण्यासाठी केवळ पोलिसच नव्हे, तर महसूल विभागानेही कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
------------------------------
सध्या सुरू असलेल्या वाळू चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ही बेकायदा वाळू चोरी कायमस्वरूपी थांबवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी.
- मनोज राऊत, उपसरपंच, चिखले

