नगरविकास खात्याकडून उत्तर मिळाले तर वाद टळतील
नगरविकास खात्याकडून उत्तर मिळाले तर वाद टळतील
आमदार संजय केळकर यांची भूमिका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : वनमंत्री गणेश नाईक हे अनुभवी नेते असून, त्यांनी अनेक वर्षे मंत्रिपद भूषविलेले आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास खात्याकडून उत्तर मिळाले, तर वाद टळतील. मात्र, त्याऐवजी वेगळेच वळण दिले जात असल्याचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले. या वेळी या वादाचा कोणताही परिणाम ठाणे महापालिकेतील महायुतीवर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना एकमेकांवर टीका करताना आचारसंहिता पाळण्याची गरज व्यक्त केली. एकमेकांवर व्यक्तिशः टीका करणे टाळायला हवे. मतभेद असावेत, पण मनभेद असू नये, असे स्पष्ट करत केळकर यांनी एकमेकांवर टीका करताना आचारसंहिता पाळण्याची गरज व्यक्त केली. ठाणेकरांच्या हितासाठी मीदेखील अधिवेशनात पुराव्यानिशी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. काही चुका झाल्या असतील, तर चौकशी लावण्याची गरज आहे. त्यामुळे ठाणेकरांमधील संशय दूर होईल, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. तसेच महायुतीबाबतचे कोणतेही निर्णय हे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात अमित शहा वेळोवेळी घेत असतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाचा कोणताही परिणाम ठाणे महापालिकेतील महायुतीवर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोमवारी पार पडलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात विकसकाकडून झालेली फसवणूक, ठाणे महापालिकेतील वारसा हक्क प्रकरण, अन्न-औषध प्रशासन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांबाबत तक्रार, सोसायटीमध्ये निवासी वापराचा वाणिज्य वापर, पथदिवे आदींबाबत निवेदने प्राप्त झाली. यावर केळकर यांनी तत्काळ संबंधितांशी बोलून चर्चा केली. तर काही प्रश्नांबाबत पाठपुरावा करून संबंधितांना न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

