विठ्ठल सायन्ना रुग्णालयात ४७ हजार शस्त्रक्रियांचा टप्पा पार
आरोग्य सुविधेचा ‘ठाणे पॅटर्न’
वर्षभरात ४७ हजारांहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी
ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) ः ठाणे जिल्हा आरोग्य विभाग गरजू आणि गरीब रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने २०२५ या वर्षभरात ४७ हजार ५०५ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. यामध्ये शस्त्रक्रियेत १४ हजार ४१९ गंभीर दुखापती आणि गंभीर आजाराचा तर, ३३ हजार ०८६ किरकोळ शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
ठाण्यातील विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालय गरीब रुग्णांसाठी आधार ठरत आहे. रुग्णालयात जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. त्यांच्यावर येथे मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. त्यानुसार जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ मध्ये या रुग्णालयात सर्वाधिक चार हजार ३४१ मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यात गंभीर आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. उत्तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा आणि उप आरोग्य केंद्रात देखील रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार झाले. शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, गोवेली, टोकावडे आदी ग्रामीण रुग्णालयांमध्ये शेकडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. प्राथमिक उपचार उपलब्ध करून देतानाच गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय केंद्रात रेफर करण्याची सुसूत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुविधांमध्ये समतोल साधण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
मोठ्या शस्त्रक्रिया
रुग्णालय मोठ्या शस्त्रक्रिया किरकोळ शस्त्रक्रिया
विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालय ४,३४१ ३२२६
सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर-३ २७०५ ६०७२
भिवंडी उपजिल्हा रुग्णालय २६४३ १२६१०
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यासह इतर राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांवरही योग्य उपचार केले जातात. त्याकरिता रुग्णालय प्रशासनाकडे आधुनिक उपचार यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पुरेशी संख्या आहे. गंभीर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील आमच्या डॉक्टरांनी यशस्वीरित्या करून दाखवल्या आहेत.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे

