१४ गावांतील प्रलंबित प्रश्नांवर उपमहापौर आक्रमक
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : १४ गाव क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांची दखल घेत उपमहापौर दशरथ भगत यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. या भागातील विकासकामांच्या अनुषंगाने नगरसेविकांनी मांडलेल्या प्रश्नांची तातडीने पूर्तता करावी, अशा लेखी सूचना उपमहापौर भगत यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिल्या आहेत. यामुळे १४ गाव क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जनहिताच्या कामांना आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१४ गाव क्षेत्रातील नगरसेविकांनी आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिन्या आणि आरोग्य सुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता, मात्र प्रशासकीय स्तरावर या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींकडून होत होती. या तक्रारींची दखल घेत उपमहापौर दशरथ भगत यांनी स्वत: या विषयात लक्ष घातले असून, थेट आयुक्तांनाच पत्र पाठवून जाब विचारला आहे. तसेच नगरसेविकांनी वारंवार केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
१४ गाव परिसरातील मूलभूत सुविधांचे प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे व जनहिताच्या मागण्या केवळ कागदावर न ठेवता, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्राद्वारे उपमहापौरांनी स्पष्ट केले आहे की, लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या तक्रारी घेऊन येतात, तेव्हा त्यावर तातडीने निर्णय घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. उपमहापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे १४ गावांतील महिला नगरसेविकांनी समाधान व्यक्त केले असून, आता प्रशासन यावर किती वेगाने पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

