गरवी तुर जोरात....

गरवी तुर जोरात....

Published on

तूर लागवडीतून दुहेरी उत्पन्न
डहाणूतील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ
वाणगाव, ता. २५ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यात भातशेती खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. अशातच शेतकरी भातपिकाच्या जोडीला तूर लागवड करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांबरोबर बांधावरील तुरीपासून दुहेरी उत्पन्नाचा फायदा होत आहे.
परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन, उत्पन्न मिळावे या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीची योजना कार्यरत केली आहे. त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे. परिणामी, तूर लागवड क्षेत्र वाढले तसेच रोजच्या आहारात मुबलक प्रमाणात प्रथिनांचा स्रोत असलेल्या कडधान्यांचा समावेश झाल्याने आदिवासी भागातील कुपोषणमुक्तीसाठी बांधावरील तूर उपयुक्त ठरत आहे. तूर उत्पादनातून शेतकरी वर्षभर खाण्यापुरती डाळ घरी ठेवून उर्वरित विक्री करून चार पैसे मिळवू शकतो.
----------------------------
६८१.६ हेक्टर क्षेत्रावर लागवड
डहाणू तालुक्यात खरीप हंगामात कृषी विभागाच्या माध्यमातून ४२६ किलो तूर बियाण्याचे वाटप झाले आहे, तर एक हजार ५४० शेतकरी योजनेत सहभागी झाले असून, ६८१.६ हेक्टर क्षेत्र कृषी विभागाच्या माध्यमातून तूर लागवड केल्याचे कृषी अधिकारी डॉ. जगन सूर्यवंशी यांनी सांगितले.
----------------------------------
भातपिकासोबत शेताच्या बांधावर किंवा पडीक माळरानावर तुरीची लागवड केली, तर वर्षभर स्वतःसाठी पुरेल एवढे तुरीचे उत्पन्न मिळू शकते. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक योजनेचा शेतकऱ्यांनी दुहेरी उत्पन्न घ्यावे.
- किशोरी विशे, उप कृषी अधिकारी, डहाणू
-------------------------------
पावसामुळे रोपांवर परिणाम झाला असला तरी तुरीच्या लागवडीपासून यंदा १०० ते १३० किलो उत्पन्न मिळेल. पुढील वर्षी शेताच्या बांधावर ही तूर लागवड करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करेन.
- रेखा डोंगरकर, प्रगतिशील शेतकरी, डहाणू

Marathi News Esakal
www.esakal.com