महापालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणास तीव्र विरोध

महापालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणास तीव्र विरोध

Published on

महापालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणास तीव्र विरोध
निर्णय रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) : बृहन्मुंबई महापालिकाच्या सहा रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे कामकाज खासगी संस्थांकडे (पीपीपी तत्त्वावर) देण्याच्या प्रस्तावाला अखिल पार्कसाईट सेवा संघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा निर्णय तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन व आमरण उपोषण छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील काजरोळकर यांनी दिली.
महापालिकेच्या भाभा रुग्णालय, बांद्रा, राजावाडी रुग्णालय, शताब्दी रुग्णालय, कांदिवली, भाभा रुग्णालय, कुर्ला, एम. टी. आगरवाल रुग्णालय आणि भगवती रुग्णालय या सहा रुग्णालयांतील रक्तपेढ्या खासगी-सार्वजनिक भागीदारीत चालविण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासकीय राजवटीत घेण्यात आल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी १५० चौ. मी. जागेची आवश्यकता असताना ३०० चौ. मी. जागा देण्याचा प्रस्ताव असल्याने संशय निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
मुंबई तसेच राज्यभरातून उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना महापालिका रुग्णालयांचा मोठा आधार असतो. प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरच्या महिलांना, नवजात बालकांना, थॅलेसेमिया, कॅन्सर, सिकलसेल ॲनेमियाग्रस्त रुग्णांना तसेच अपघातग्रस्तांना मोफत अथवा शासकीय दरात रक्त व रक्तघटक पुरविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या रक्तपेढ्यांमधून केले जाते. कोविड काळातही या रक्तपेढ्यांनी अविरत सेवा देत अनेकांचे प्राण वाचवले असल्याचे संघटनेने नमूद केले.
संघटनेचे अध्यक्ष सुनील सिताराम काजरोळकर म्हणाले, “खासगी संस्थांकडे रक्तपेढ्या दिल्यास सेवाभावाऐवजी नफेखोरीला प्राधान्य दिले जाईल आणि रक्ताचे व्यापारीकरण होण्याची भीती आहे. गोरगरीब रुग्णांना महागड्या दरात रक्त खरेदी करणे परवडणारे नाही.” महापालिकेच्या पूर्ण क्षमतेने सुरू असलेल्या रक्तपेढ्यांचे सक्षमीकरण करावे; मात्र त्यांचे खासगीकरण करू नये, अशी त्यांची मागणी आहे.
अखिल पार्कसाईट सेवा संघ गेली २८ वर्षे महापालिका रुग्णालयांसाठी सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करीत आहे. नायर रुग्णालय, के. ई. एम. रुग्णालय, कामा अँड अल्ब्लेस रुग्णालय, लोकमान्य टिळक रुग्णालय आणि सर जे. जे. रुग्णालय आदी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणावर मोफत रक्तपुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळातही रक्तदान शिबिरांमध्ये खंड पडू दिला नसल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई उपनगरातील व्ही. सी. गांधी व एम. ए. वोरा महापालिका रुग्णालय रक्तपेढी तसेच राजावाडी (घाटकोपर) रक्तपेढीने कोविड काळात उल्लेखनीय कार्य केले आहे. मुलुंड ते कुर्ला या पूर्व उपनगर पट्ट्यातील ही एकमेव महापालिका रक्तपेढी असल्याने तिचे खासगीकरण करू नये, अशी संघटनेची भूमिका आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com