‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक

‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक

Published on

‘हिंद दी चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांचे प्रतिपादन

पालघर, ता. २५ (बातमीदार) : अंबिस्ते येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या वेळी त्यांनी ‘हिंद दी चादर’ संकल्पनेचा मूलभूत संदेश त्यांच्या मनात रुजवण्याची गरज अधोरेखित केली. तसेच ‘हिंद दी चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक असल्याचे मत या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सूफी गायक सतिंदर सरताज यांच्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमास प्रांत अधिकारी प्रदीप चव्हाण, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
भक्तिगीतानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ‘गाण्याचा अर्थ कोणाला समजला का?’ असा थेट प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणाची संधी दिली. प्रत्येक कृतीमागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. केवळ ऐकणे नव्हे, तर त्यातून मूल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी शीख धर्माचे नववे गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘हिंद दी चादर’ म्हणजे हिंदू धर्माचे नव्हे, तर संपूर्ण हिंद म्हणजेच भारतभूमीचे संरक्षण करणारे होते. हा संदेश धार्मिक सहिष्णुता, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या मूल्यांना बळकटी देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
-------------------
धर्मनिरपेक्षतेचा संविधानिक संदेश
आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म पाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. कोणालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. गुरू तेग बहादूर यांनी याच मूल्यांसाठी बलिदान दिले, असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली. गुरुद्वारातील सेवाभावाचा उल्लेख करीत त्यांनी सेवा, नम्रता आणि स्वावलंबनाचे महत्त्व समजावून सांगितले. समाजासाठी नि:स्वार्थ सेवा आणि स्वतःचे कार्य स्वतः करण्याची वृत्ती अंगीकारली तरच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. अंबिस्ते येथील आश्रमशाळेतील सकारात्मक शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि शिक्षकांचे प्रयत्न यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. महापुरुषांचे आदर्श समोर ठेवून आपण जीवनात यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com