ठाणे जिल्ह्यातील चालकांना ओळखपत्रांचे वाटप
रिक्षा-टॅक्सीचालकांच्या सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे जिल्ह्यात ओळखपत्रांचे वाटप
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) : महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सीचालकांच्या विकासासाठी स्थापित करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाच्या सभासद नोंदणीला चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हजार ३५० रिक्षा-टॅक्सीचालकांनी मंडळाचे सदस्यपद स्वीकारले असून, मंडळाच्या कार्यालयात सदस्य होऊ इच्छिणाऱ्यांची गर्दी होत आहे. राज्य शासनामार्फत चालविले जाणारे हे मंडळ रिक्षा-टॅक्सीचालकांचा सर्वांगीण विकास, त्यांच्या कुटुंबीयांचे हित आणि मुलांच्या शिक्षणासाठी काम करीत आहे. राज्यातील सुमारे १० लाख चालकांना या मंडळाचा फायदा होणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा-टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ राज्यातील असंघटित रिक्षा-टॅक्सीचालकांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, निवृत्तिवेतन आणि मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारी एक मुख्य संस्था आहे. मंडळामार्फत ६५ वर्षांवरील चालकांना १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या मंडळाचे प्रमुख कार्यालय ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागात आहे. राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांच्या विकासासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार मंडळाच्या सभासदांची अधिकृत ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील एक हजार ३५० सदस्यांना ओळखपत्र दिले असून, मंगळवारी (ता. २४) प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्यावर मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कामकाज सुरू आहे. ३ जुलै २०२५ पासून मंडळ सुरू करण्यात आले आहे. मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी चालकांना ८०० रुपये देऊन सभासद होता येणार आहे. ज्या रिक्षा-टॅक्सीचालकांनी अद्याप मंडळाचे सदस्यत्व घेतलेले नाही अशांनी लवकरात लवकर मंडळाचे सदस्य व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील असंघटित रिक्षा-टॅक्सीचालकांना सामाजिक पत देणारे आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासाला हातभार लावण्याचे काम मंडळाकडून केले जाणार आहे. त्याकरिता राज्यभरातील असंघटित रिक्षा-टॅक्सीचालकांनी मंडळाचे सभासद होणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता चालकांनी मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
- हेमांगिनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी
------------------
- मंडळाच्या प्रमुख कार्य आणि योजना : ६५ वर्षांवरील पात्र चालकांना १० हजार रुपयांचा एकरकमी सन्मान निधी
- अपघात विमा आणि आरोग्य विमा
- चालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक मदत
- उत्कृष्ट रिक्षा-टॅक्सीचालक आणि स्टँडला पुरस्कार व मान्यता
- राज्य आणि जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांच्या निधीतून चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी काम
ठाणे : मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या हस्ते चालकांना ओळखपत्र देण्यात आले.

