रिक्षात विसरलेली पैशांनी भरलेली बॅग पोलिसांनी तीन तासांत शोधली

रिक्षात विसरलेली पैशांनी भरलेली बॅग पोलिसांनी तीन तासांत शोधली

Published on

रिक्षात विसरलेल्या पैशांच्या बॅगेचा तीन तासांत शोध
६५ हजारांची रोकड मोबाईलसह मालकाकडे सुपूर्द

डोंबिवली, ता. २६ : प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली मौल्यवान वस्तू परत मिळण्याची शक्यता धूसर असताना, मानपाडा पोलिसांनी आपल्या कार्यतत्परतेचा प्रत्यय दिला आहे. रिक्षात विसरलेली ६४ हजार ९०० रुपयांची रोकड आणि मोबाईल असलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासांत शोधून काढून मूळ मालकाच्या स्वाधीन केली.

मानपाडा सर्कल परिसरात राहणारे नरेश आजाराम देवसी (२०) हे मानपाडा सर्कल ते नांदिवली असा रिक्षा प्रवास करत होते. घाईगडबडीत उतरताना ते आपली बॅग रिक्षातच विसरले. या बॅगमध्ये ६४ हजार ९०० रुपये रोख रक्कम, तसेच ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. बॅग रिक्षात राहिल्याचे लक्षात येताच नरेश देवसी यांनी क्षणाचाही विलंब न लावता मानपाडा पोलिस ठाणे गाठले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात एएसआय सुनील पवार, पोलिस शिपाई विजय आव्हाड आणि सोपान शेळके यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलिसांनी रिक्षाच्या प्रवासाचा मार्ग तपासून त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पडताळणी केली. या तांत्रिक तपासाद्वारे संबंधित रिक्षा आणि चालकाचा शोध घेऊन पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली.

कौतुकाचा वर्षाव
तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत आपली बॅग सुरक्षित मिळाल्याने नरेश देवसी यांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस मित्र आहेत, याचा अनुभव आज आला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मानपाडा पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे डोंबिवलीकरांकडून जोरदार कौतुक होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com