शिवसेना ठाकरे पक्ष आणि कॉंग्रेस आक्रमक
‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा
शिवसेना, काँग्रेस पक्ष महापालिका सभेत आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः कुलाबा येथील नौदलाच्या तळाजवळ ५०० मीटर परिसरात टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. नौदलाची परवानगी नसताना पालिकेच्या इमारत विभागाने इमारतीसाठी परवानगी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली, तर वरळी येथे एसटीपी प्लांट उभारणीसाठी आवश्यक जागा कमी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्याचा हरकतीचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला.
दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे नौदलाच्या तळाजवळ ५०० मीटर अंतरावर २३ मजली टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. इमारत उभारण्यासाठी नौदलाची परवानगी नसताना पालिकेच्या इमारत विभागाने परवानगी दिलीच कशी, यामुळे सुरक्षेचा मोठा धोका निर्माण होतो. यासंदर्भात सध्या न्यायालयात प्रकरण आहे. या इमारतीचे बांधकाम हे २०११ पासून सुरू आहे. नौदलाच्या महत्त्वाच्या तळापासून अगदी ५०० मीटर अंतरात उत्तुंग इमारती उभ्या राहता कामा नये आणि तसे नियमही आहे; मात्र इमारती उभी राहिली कशी? गेली चार वर्षे लोकप्रतिनिधी नसताही अनेकांनी जागा बळकावल्या. महापालिका अधिकाऱ्यांनी विकसकांसाठी हव्या तशा योजना राबवल्या, त्या वेळी महापालिका अधिकारी काय करीत होते? त्यामुळे यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पडवळ यांनी केली आहे.
वरळीतील एसटीपी प्लांटवरूनही ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत महापालिकेला धारेवर धरले. वरळीतील मलनिस्सारण प्रकल्पासाठी (एसटीपी प्लांट) आवश्यक भूखंडाच्या आकारमानात कपात करण्यावरून काँग्रेसने हरकतीचा मुद्दा घेतला.
कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात?
येथील सार्वजनिक सुविधांसाठी विकास योजनेअंतर्गंत आरक्षित असलेली सुमारे २७ हजार ७०० चौरस मीटर जमीन सुमारे १७ हजार ७५० चौरस मीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी वरळीतील एसटीपी भूखंडाचा गंभीर मुद्दा असल्याचे स्पष्ट केले. महापालिका आयुक्त, अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात, हे स्पष्ट दिसत असून यामध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.
-------------
पुढच्या बैठकीत अहवाल
या दोन्ही गोष्टींचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात येईल, असे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. दरम्यान, हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आल्याचे सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी या वेळी सांगितले.
------------

