०१८ पासून किती भूखंड ताब्यात घेतले
किती भूखंड ताब्यात घेतले!
सुधार समितीत स्वप्ना म्हात्रे यांचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः पालिकेच्या २०३४ च्या नवीन विकास आराखड्याची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली. २०१८ ते आतापर्यंत पालिकेने किती भूखंड ताब्यात घेतले, किती भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, २०१४ पूर्वी किती भूखंड ताब्यात घेतले, यासाठी किती पैसे मोजले, याची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी सुधार समिती सदस्य स्वप्ना म्हात्रे यांनी केली.
विकास आराखड्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली. २०१८ ते आतापर्यंत आठ वर्षे होत आली. या आठ वर्षांत पालिकेने किती भूखंड ताब्यात घेतले, भूखंड ताब्यात घेण्याबाबत किती प्रकरणे न्यायालयात, किती भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, भूखंड ताब्यात घेण्यासाठी किती रकमेची तरतूद करण्यात आली आहे, याची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्वप्ना म्हात्रे यांनी सुधार समितीत केली.
विशेष म्हणजे २०१४ आधी पालिकेने किती भूखंड ताब्यात घेतले, भूखंड ताब्यात घेण्यासाठी किती पैसे मोजले, याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. या सगळ्या मुद्द्यांची माहिती संबंधित विभागाकडून घेऊन पुढील बैठकीत सादर करण्यात येईल, असे सुधार समितीचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. दरम्यान, स्वप्ना म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची माहिती सादर होईपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येतो, असे सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी सांगितले.

