उल्हास नदीसाठी संतापाच्या ज्वाला!
उल्हास नदीसाठी संतापाच्या ज्वाला
नदी वाचवा भविष्य वाचवाचा गजर; उल्हासनगरात प्रदूषणाविरोधात जनआंदोलन
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : होळीच्या ज्वाला यंदा केवळ उत्सवासाठी नव्हे, तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी पेटल्या. शहराची जीवनदायिनी असलेल्या उल्हास आणि वालधुनी नदीच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात नागरिकांनी नदीकाठी एकत्र येत ‘प्रदूषण निषेध होळी’ प्रज्वलित केली. रंगांच्या सणापूर्वीच पेटलेल्या या निषेधाच्या ज्वालांनी प्रशासकीय अनास्थेवर ताशेरे ओढत नदी संवर्धनाचा जाज्वल्य संदेश दिला.
उल्हासनगर परिसरात नदी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, अनियंत्रित सांडपाणी आणि प्रक्रिया न केलेला औद्योगिक स्राव यामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त नागरिकांनी एकत्र येत “नदी वाचवा – भविष्य वाचवा” आणि “प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात शशिकांत दायमा, रवींद्र लिंगायत, अविनाश सुक्रे, पंकज गुरव, राकेश कोनकर, जयश्री सातपुते, प्रवीण दिघे, नितीन वाघमारे, प्रशांत राऊत, गोविंद बागुल, अश्फाक शेख यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलकांच्या मागण्या
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, नदीपात्राची नियमित शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करणे, बेकायदेशीर नळजोडण्या आणि औद्योगिक स्राव सोडणाऱ्या घटकांवर फौजदारी कारवाई करणे अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.
अस्तित्वाचा लढा
प्रतीकात्मक स्वरूपात पेटविण्यात आलेल्या या निषेध होळीतून पर्यावरणाप्रती असलेला कळवळा आणि प्रशासनाविरुद्धचा रोष स्पष्टपणे दिसून आला. हा लढा केवळ एका नदीचा नसून पुढील पिढ्यांच्या आरोग्याचा आणि अस्तित्वाचा आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
“उल्हास आणि वालधूनी नद्या या शहराच्या जीवनरेषा आहेत. आजची निषेध होळी ही प्रशासन आणि प्रदूषणास जबाबदार घटकांना जाग आणण्यासाठी आहे. दररोज नदीत सोडले जाणारे सांडपाणी हा आपल्या भविष्यावरील घाला आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत आणि बेकायदेशीर औद्योगिक स्राव थांबेपर्यंत आमचा हा लढा निर्णायक असेल. नदी वाचली, तरच शहर वाचेल!”
- शशिकांत दायमा (पर्यावरणप्रेमी)

