

अंबरनाथ (वार्ताहर) : शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने अंबरनाथ नगर परिषदेने धडक कारवाई करत छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट आणि रेल्वे स्थानक परिसरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला. केवळ जनजागृतीपुरते न थांबता नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे व उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या आदेशानुसार, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि स्वच्छता निरीक्षकांनी ही मोहीम राबवली. प्रशासनाने इशारा दिला की, पहिल्या वेळी पाच हजार, दुसऱ्या वेळी १० हजार आणि तिसऱ्या वेळी २५ हजार रुपये दंडासह तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. नागरिकांनी प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात, असे आवाहन करण्यात आले.