सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर न्याय
सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर न्याय
महसूलमंत्र्यांकडून सातबारा देण्याची घोषणा
पालघर, ता. ४ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणामुळे विस्थापित चंद्रानगर, हनुमाननगर येथील २०५ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सातबारा उतारे, जमिनीचे नकाशे वाटप करण्यात येतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली आहे. त्यामुळे ४५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आदिवासींना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यात १९७० ते १९८२ दरम्यान सूर्या धरण प्रकल्पासाठी ११ गावांचे विस्थापन झाले. त्यापैकी चंद्रानगर, हनुमाननगर गावांतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी ४५ वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांना सातबारा उतारे, गाव नकाशा, चतुर्सीमा नकाशा किंवा संपादित जमिनींचा योग्य मोबदला मिळालेला नाही. तसेच सातबारा उतारे नसताना परिसरातील जमिनी वाढवण बंदर, बुलेट ट्रेनसाठी संपादित केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सातबारा उतारे देण्याची तसेच जमिनींचा मोबदला कधी देळणार, असा प्रश्न आमदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केला होता.
----------------------
पुन्हा जमिनींचे सीमांकन
या प्रकरणात ४६७ खातेदारांपैकी २६२ खातेदारांना सातबारा उतारे देण्यात आले आहेत. उर्वरित २०० हून अधिक शेतकरी बाकी आहेत, पण जमिनींचे स्पष्ट सीमांकन झाले नसल्यामुळे काही ठिकाणी क्षेत्रफळात बदल झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या जमिनी इतरांच्या क्षेत्रात गेल्या आहेत, तर काही ठिकाणी अतिक्रमणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्व जमिनींचे पुन्हा सीमांकन करून अचूक नकाशे तयार करण्याचे काम सुरू आहे.

