शेतकरी राजाला हक्काचे शेतमाल विक्री केंद्र

शेतकरी राजाला हक्काचे शेतमाल विक्री केंद्र
Published on

शेतकरीराजाला हक्काचे शेतमाल विक्री केंद्र
शीतगृहासह बहुउद्देशीय शेतकरी-व्यापारी, ग्राहक मार्केट योजना

प्रसाद जोशी

वसई ता. ११ (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र आहे; मात्र कृषीसंबंधी येणाऱ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असतो. त्यांच्यासाठी शेतमाल विक्री केंद्र उपलब्ध नाही, त्यामुळे गैरसोय निर्माण होत असते. महापालिकेने यावर तोडगा काढत शीतगृहासह बहुउद्देशीय शेतकरी, व्यापारी ग्राहक मार्केट योजना राबविण्यासाठी हिरवा कंदील दिला असल्याने याचा फायदा शेतकरीराजाला होणार आहे.
वसई-विरार शहर महापालिकेत अनेक गावांचा समावेश आहे. आजही येथे शेतजमीन कसली जाते. शेती, फळबागायत, भाजीपाला व फुलशेतीवर शेतकऱ्यांचे अर्थार्जन अवलंबून आहे. येथील विविध प्रकारचा भाजीपाला व फुले विक्रीसाठी मुंबई, ठाणे तसेच वसई-विरार शहरातील विविध भागात जावे लागते. त्यासाठी वेळ व पैसा खर्चिक होत असतो. त्यामुळे वसईतच कृषी मालविक्री केंद्राची मागणी अनेकदा शेतकऱ्यांनी केली; मात्र त्याला यश आले नाही. शेतकऱ्यांसह मोठ्या बागायतदारांना सोयीसुविधा मिळाल्या, तर येथील शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो व शेती-बागायत अधिक समृद्धीकडे वाटचाल करेल, त्यामुळे यंदा महापालिकेने शेतकरी, ग्राहक आणि व्यापारी अशी तिहेरी सांगड घालणारी योजना राबविण्याचा संकल्प केला असल्याने एकाच ठिकाणी व्यवसायाची संधी मिळणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा याची बचत होणार असून आर्थिक लाभ होणार आहे.
शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना एकाच ठिकाणी आधुनिक व सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शीतगृहासह बहुउद्देशीय मार्केट उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊन मालाची नासाडी कमी होण्यास मदत होईल, तसेच ग्राहकांना दर्जेदार व ताज्या वस्तू सहज मिळू शकतील. या योजनेसाठी महापालिकेने अंदाजपत्रकात पाच कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
---------------
कसे असेल शेतमाल विक्री केंद्र?
भाजीपाला व फळांसाठी साठवण सुविधा
शीतगृह व्यवस्था
विक्री स्टॉल
स्वच्छता सुविधा व आवश्यक पायाभूत विकास
---------------
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधासंपन्न बाजारपेठ योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. याचा स्थायीच्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला असून यात शीतगृहदेखील असणार आहे. ज्यामुळे भाजीपाल्याची नासाडी होणार नाही व शेतकऱ्यांना फायदा होईल.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
----------------
वसई-विरार शहर महापालिकेची शेतकऱ्यांसाठी योजना चांगली आहे. शेतमाल विक्री केंद्रामुळे याचा फायदा हा शेतकऱ्यांना होईल; मात्र याची अंमलबजावणी लवकर व्हावी, ही अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com