कल्याण-डोंबिवलीत उष्णतेच्या लाटेचा इशारा
पालिकेचा ‘उष्णता कृती आराखडा’ जाहीर
आरोग्य विभागाकडून नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : राज्यासह कल्याण-डोंबिवलीतही उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून, पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सतत दोन दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेल्यास ती उष्णतेची लाट मानली जाते. अशा स्थितीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने ‘काय करावे आणि काय करू नये’ याची सविस्तर नियमावली जाहीर करत उष्णता कृती आराखडा तयार केला आहे.
उष्णतेपासून संरक्षणासाठी तहान नसली तरीही भरपूर पाणी प्या. प्रवासात पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे आणि सैल सुती कपडे वापरा. उन्हात जाताना छत्री, गॉगल, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करा. घराचे वातावरण थंड ठेवण्यासाठी पडदे, पंखे किंवा कूलरचा वापर करा. लिंबू सरबत, लस्सी, ताक यांसारख्या नैसर्गिक पेयांचे सेवन वाढवा. असे उपाय सुचवले आहेत. पाळीव प्राण्यांना सावलीत आणि थंड ठिकाणी बांधा, त्यांना पुरेसे पाणी द्या, असेही आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, मळमळणे किंवा डोकेदुखी जाणवल्यास तत्काळ जवळच्या महापालिका रुग्णालयात संपर्क साधावा. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
उन्हात ‘या’ गोष्टी टाळा
दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात बाहेर जाणे किंवा कष्टाची कामे करणे टाळा.
पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नका.
चहा, कॉफी, मद्य आणि साखरयुक्त पेयांचे सेवन टाळा; कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच उन्हाळ्यात शिळे अन्न खाणे टाळा.
दुपारी स्वयंपाक करणे शक्यतो टाळा आणि स्वयंपाकघराची खिडकी-दरवाजे उघडे ठेवून हवा खेळती ठेवा.

