कमी पाहुणे मंडळींमध्ये समारंभ

कमी पाहुणे मंडळींमध्ये समारंभ

Published on

बेलापूर, ता. १२ (बातमीदार) : मार्च उजाडला की सुरू होते ती लगीन घाई. मात्र यंदा विघ्न आहे ते आखाती देशांमधील सुरू असणाऱ्या युद्धाचे. या युद्धामुळे भारतात गॅस दरवाढ, अल्प पुरवठा सुरू असून विविध हॉटेल व्यावसायिक, केटरर्स अडचणीत सापडले आहेत. बहुतांश हॉटेल्स बंद ठेवण्यात आले आहेत, तर अनेक लग्न सोहळ्यात कमी पाहुण्यामध्ये समारंभ साजरा होत आहे, तर अनेकांनी आपले लग्न कार्य पुढे ढकलले असल्याचे नवी मुंबई वेडिंग असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात सर्वत्र सध्या चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. यामध्ये घरगुती एलपीजीची किंमत ६० रुपयांनी वाढली असून नवी मुंबई शहरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच पाच-सहा महिने आधी लग्नाचे मुहूर्त काढून हॉल, मैदाने बुकिंग करणाऱ्या नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. गॅस पुरवठा अभावी अनेक केटरर्स अडचणीत सापडल्याने कमी पाहण्यात लग्न करावे अन्यथा मुहूर्त पुढे ढकलावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

गॅस दरवाढ, हॉटेल व्यावसायिकांना गॅस बुकिंग मिळत नसल्याने आम्हा केटरर्स व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. लग्नाचा मुहूर्त तोंडावर असताना अनेकांनी लग्न पुढे ढकलली आहेत. बहुतांश लोकांनी आपली पाहुणे मंडळींची संख्या घटवून लग्न करण्याचे ठरवले आहे. याचा संपूर्ण भार आमच्यावर आला आहे, असे नवी मुंबई वेडिंग असोसिएशनचे कैलास मुद्रास यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com