अंबरनाथच्या पाणीटंचाईचे ‘लाईव्ह’ दर्शन

अंबरनाथच्या पाणीटंचाईचे ‘लाईव्ह’ दर्शन

Published on

अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : अंबरनाथ पश्चिमेकडील अनेक भागांत चार-चार दिवसांनी आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांनी गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वारंवार पाठपुरावा, आंदोलन आणि उपोषण करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे परिसरातील भीषण पाणीटंचाईचे वास्तव अधिकाऱ्यांना दाखवले. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोर्चा काढून अधिकाऱ्यांना ‘सरप्राईज गिफ्ट’ देऊ, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या जयश्री गुप्ता यांनी दिला.
अंबरनाथ पश्चिमेतील जावसई, फुलेनगर, कमलाकर नगर, डिफेन्स कॉलनी, मेहेंद्रनगर आणि ठाकूर पाडा या भागांमध्ये अनेक वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी दिवसाआड किंवा चार दिवसांनी पाणी सोडले जाते आणि तेही अत्यंत कमी दाबाने मिळत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी वणवण सुरू आहे. काही महिलांना नोकरी सोडावी लागली, तर विद्यार्थ्यांना पाण्यासाठी घरी थांबावे लागल्याने शिक्षणावरही परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या परिस्थितीमुळे संतप्त नागरिकांनी एमजेपी कार्यालयात अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिलांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या परिसरात कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचे दृश्य दाखवले. शहराजवळ दोन धरणे असतानाही अंबरनाथकरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. पाणीपुरवठा आठ दिवसांत सुरळीत न झाल्यास पोलिस बंदोबस्तात मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गुप्ता यांनी या वेळी दिला. तर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा फुलेनगरचे ग्रामस्थ शिवशंकर रेड्डी यांनी दिला.

पाणीटंचाईची कारणे
पाणीचोरी, टँकरमाफिया, गळती होणाऱ्या जलवाहिन्या; तसेच अनधिकृत नळजोडण्या यामुळेच पाणीटंचाई वाढत असल्याचा आरोपही महिलांनी केला. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून समस्या समजून घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या भागातील अनेक नागरिक हातमजुरी किंवा एमआयडीसीतील कामगार असल्याने दररोज टँकर मागवणे त्यांना परवडत नसल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे दिवसाआड येणारे पाणी सकाळी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत तुटवडा भरून काढण्यासाठी एमआयडीसीकडून अंबरनाथ व बदलापूरसाठी वाढीव पाणी देण्याची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास नागरिकांना नियमित व वेळेवर पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- मिलिंद देशपांडे, अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

अंबरनाथ : पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी महिलांनी एमजेपी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com