आज जिल्हा परिषदेवर मोर्चा
वाडा, ता. १७ (बातमीदार) : पेसा कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यात आपल्या हक्काच्या १७ पदांच्या नोकऱ्या २०१४ पासून पेसा कायद्याचा चुकीचा अर्थ लावून तत्कालीन राज्यपालांच्या अध्यादेशाने सरकारने फक्त आदिवासी समाजबांधवांसाठी राखीव केल्या आहेत. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांतील ओबीसी, एससी, एनटी व इतर सर्व बिगर आदिवासी समाज घटकांवर अन्याय झाल्याची भावना आहे. त्यासाठी न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई बिगर आदिवासी समाज लढत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज घटकांतील कंत्राटी शिक्षक सोमवार (ता. १६)पासून काम बंद व जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व इतर नोकऱ्यांमध्ये आपला हक्क मिळविण्यासाठी उद्या (ता. १८) आरक्षण हक्क बचाव समितीच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बिगर आदिवासी समाज उपस्थित राहणार आहे. वाडा तालुक्यातून सुमारे अडीच हजारांच्या आसपास बिगर आदिवासी समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक प्रफुल्ल पाटील आणि युवराज ठाकरे यांनी दिली.

