१९ मार्चला सकाळी ६.५३ नंतर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करावा - पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण
सकाळी ६.५३ नंतर गुढी उभारावी
पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण
ठाणे, ता. १८ (बातमीदार) : गुढीपाडवा सण गुरुवारी (ता. १९) साजरा करण्यात येणार असून, सकाळी ६.५३ नंतर गुढी उभारणे योग्य असल्याची माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी सूर्योदयाला नसल्यामुळे ती ‘क्षयतिथी’ मानली जात आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी ६.५३ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे.
या क्षणापासून शालिवाहन शक १९४८ ‘पराभव’ नाम संवत्सर सुरू होणार आहे. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन उपक्रमांची सुरुवात, खरेदी किंवा शुभकार्य करण्यास विशेष महत्त्व दिले जाते. यंदाच्या संवत्सराचे नाव ‘पराभव’ असे असून अनीती, असत्य, दुष्टपणा, स्वार्थीपणा आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचा पराभव होईल, असा त्याचा आशय समजला जातो. संवत्सरांची एकूण ६० नावे असून ती ठरावीक क्रमाने येत असतात. यापूर्वी २८ मार्च २०१७लाही चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी आली होती. त्या वेळी अमावास्या तिथी संपल्यानंतर गुढीपाडवा साजरा करण्यात आला होता. यंदाच्या वर्षानंतर अशीच स्थिती पुढे १० एप्रिल २०३२ला येणार असल्याची माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.

