श्री साई गणेश मंडळाची भव्य पदयात्रा
मांडा-टिटवाळ्यात फुलला भक्तीचा मळा
श्री साई गणेश मंडळाची रौप्य महोत्सवी पदयात्रा शिर्डीकडे रवाना
टिटवाळा, ता. १९ (वार्ताहर) : ‘साई राम''च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मांडा-टिटवाळा येथील श्री साई गणेश मंडळाच्या पदयात्रेचे शिर्डीकडे प्रस्थान झाले. यंदा मंडळाचे रौप्य महोत्सवी (२५वे) वर्ष असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघालेल्या या पालखीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
गुरुवारी (ता. १९) सकाळी १० वाजता विधिवत पूजनानंतर पालखी मार्गस्थ झाली. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी आणि हजारो साईभक्तांच्या सहभागाने मांडा-टिटवाळा परिसरात जणू भक्तीचा महासागर उसळला होता. गेल्या अडीच दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरी होत आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे. पदयात्रेत भाविकांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष किशोर शुक्ला यांनी या वेळी सांगितले, की सलग २५ वर्षे साई पालखीला मिळत असलेला हा प्रतिसाद गौरवशाली आहे. हा वारसा अशाच समृद्धीने पुढे चालू राहील.
महाप्रसादाचे आयोजन
पदयात्रा संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी भव्य साई भंडारा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. २९) सायंकाळी ५ वाजल्यापासून मांडा-टिटवाळा (पूर्व) येथील सावरकर नगरमध्ये अजिंक्य, शिवसेना शाखेजवळ हा कार्यक्रम पार पडणार आहे. या मंगलप्रसंगी सर्व साईभक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन किशोर शुक्ला व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या यशस्वी आयोजनासाठी सर्व देणगीदार आणि साईभक्तांचे मंडळाकडून आभार मानण्यात आले आहेत.

