शिवसैनिकांनी दिलेल्या निवेदनाची एम.एस.सी.बी.ने घेतली दखल;
लोणेरे गावातील वर्षानुवर्षांची वीज समस्या मार्गी
माणगाव, ता. २२ (वार्ताहर) ः तालुक्यातील लोणेरे गावामध्ये अनेक वर्षांपासून थ्री फेज लाइन नसल्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांनी महावितरणकडे याप्रश्नी अनेकदा उपाययोजना करण्याची मागणी केली होती, तर शिवसैनिकांनीही यासंदर्भात महावितरणकडे निवेदन दिले होते. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तातडीने उपाययोजना केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
लोणेरे गावामध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पंखा, लाइट, एसी, फ्रिज यांसारखी विद्युत उपकरणेदेखील व्यवस्थित चालत नव्हती, तर महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याप्रकरणी ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले, तर शिवसैनिकांनी गोरेगाव विभाग कार्यालयात कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील आणि उपकार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेऊन निवेदन सादर करत वीज समस्येची सविस्तर माहिती दिली. यामध्ये विधानसभा समन्वयक नीलेश केसरकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अभिजित टेंबे, युवा नेते सयजू टेंबे, अविनाश टेंबे, सचिन उतेकर आणि भूषण टेंबे आदी उपस्थित होते.
यानुसार गोरेगाव विभागाने तत्काळ कार्यवाही करत आवश्यक काम पूर्ण केले असून, वीजपुरवठा सुरळीत केला असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी लाइनमन केशव जाबरे, वायरमन सोमेश्वर कालसरपे, भावेश धोडगे, अनिकेत कोदे विशेष मेहनत घेतली.

