ई चलान दंडाचे ओझे झाले हलके
ई-चलान दंडाचे ओझे झाले हलक
एक कोटी ३८ लाखांचा थकीत दंड न्यायालयाकडे जमा
ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) ः राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमाला हजारो वाहनचालकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे सरकारच्या महसुलात भर पडली असून, ई-चलान दंडाचे ओझेही हलके झाले आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या १८ युनिट अंतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल नऊ हजार ३५४ खटले निकाली काढत एकूण एक कोटी ३८ लाख ५३ हजार ३०० इतका थकीत ई-चलान दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेला दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर खटला दाखल करण्यात येतो. अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजणकर यांच्या पुढाकाराने शनिवार (ता. १४) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. या अदालतीत तडजोडीअंती एकूण नऊ हजार ३५४ खटले निकाली काढले असून, वाहनधारकांनी एकूण एक कोटी ३८ लाख ५३ हजार ३०० रुपये थकीत दंड न्यायालयात जमा केला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
दर तीन महिन्यांनी संधी
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्याकरिता वाहतूक पोलिसांकडून दंडाचे ई-चलान वाहनधारकाच्या मोबाईलवर पाठवले जाते. यात दंड भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर खटला दाखल केला जातो. अशी हजारो प्रलंबित प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्याची संधी दर तीन महिन्यांनी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उपलब्ध केली जाते. त्यानुसार थकीत ई-चलान दंड भरणाऱ्या वाहनधारकांना सवलत देण्यात येते.
लोकअदालतीचा हा उपक्रम केवळ दंडवसुलीसाठी नसून वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये सजगता यावी यासाठी आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेकांचे प्राण वाचतील. शिवाय ई-चलान दंडाचा भुर्दंडदेखील बसणार नाही. तेव्हा प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून दंडात्मक कारवाई टाळावी.
- पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा

