नवी मुंबईकरांचा सिग्नलमुक्त प्रवास

नवी मुंबईकरांचा सिग्नलमुक्त प्रवास

Published on

वाशी, ता. २३ (बातमीदार) : ठाणे ते बेलापूर मार्गावरून प्रवास करणाऱ्या नवी मुंबईतील नागरिकांना आता सिग्नलमुक्त सुसाट प्रवास करता येणार आहे. या मार्गावर सहा ठिकाणी उड्डाणपूल आहेत. आता या रस्त्यावर रबाळे, पावणे, तुर्भे येथे उड्डाणपूल, तसेच पाम बीच मार्गाच्या शेवटी अर्थात महापालिका मुख्यालयाजवळ दुहेरी भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. या प्रस्तावाला सोमवारी (ता. २३) झालेल्या महासभेत हिरवा कंदील देण्यात आला आहे.

पालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांनी महासभेत या प्रकल्पाच्या खर्चाचा टप्प्याचा प्रस्ताव, तसेच पुलाच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला. शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना नवी मुंबई विमानतळ, त्याचप्रमाणे अटल सेतू, तसेच वाशी आणि ऐरोली खाडी जोड पुलामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचाच शहरातील वाढत्या विकासकामांमुळे भविष्यातील वाहतूक समस्यांचा वाढता ताण लक्षात घेता वाहतूक नियोजन करण्याच्या अनुषंगाने ठाणे ते बेलापूर मार्गावर उड्डाणपूल आणि दुहेरी भुयारी मार्ग उभारणे आवश्यक असल्याने हा प्रस्ताव मांडल्याचे नाईक म्हणाले.

नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी शहरातील या उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाबरोबरच आवश्यक ठिकाणी उड्डाणपुलांच्या उभारणीकरिता सर्व्हे करावा, अशी मागणी केली. या उड्डाणपुलाच्या प्रस्तावावर चर्चा करताना विरोधकांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यात स्वीकृत सदस्य अंकुश कदम यांनी शहरासाठी उड्डाणपुलाची जरी आवश्यकता असली तरी अनावश्यक पैशाची उधळपट्टी थांबवा, असे मत मांडले.

निधीची उधळपट्टी नको
ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांनी बोनकोडे येथे ४२ कोटींच्या सी-टाइप उड्डाणपुलाचा वापर नागरिकांसाठी होतो का, असा प्रश्न उपस्थित करीत, ज्याप्रमाणे या उड्डाणपुलासाठी पैशांची उधळपट्टी झाली, त्याप्रमाणे या तीन उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या हट्टासाठी सत्ताधाऱ्यांनी शहराला कर्जात बुडवू नका, अशी खरमरीत टीका केली.

खर्चाची माहिती दडवल्याचा दावा
उड्डाणपूल आणि दुहेरी भुयारी मार्गाचा प्रस्ताव मांडत असताना विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. हा प्रस्ताव महापौरांकडून येणे अपेक्षित असताना सभागृह नेत्यांनी मांडल्याने नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी शंका उपस्थित केली. या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार नेमणे आणि या उड्डाणपुलासाठी किती खर्च केला जाणार आहे, याची माहिती सभागृहाला देण्यात न आल्याने प्रस्तावावर आक्षेप घेतला. सभागृहाला खर्चाची माहिती दिली जात नाही, त्यामुळे खर्चासहित हा प्रस्ताव फेरबदल करून पाठवण्याची मागणी विरोधकांनी केली; मात्र संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. सुधाकर सोनवणे यांनी केलेल्या सूचनेनुसार बदल करून हा प्रस्ताव सर्व मताने मंजूर केल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी घोषित केले. या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करण्यास आणि संबंधित अधिकार आयुक्तांना देण्यासही महासभेने मान्यता दिली.

झोपडपट्टी भागातील गर्दीचे काय ः विजय चौगुले
शहरासाठी केवळ सभागृह नेत्यांनी सूचित केलेल्या उड्डाणपूल आणि भुयारीमार्गाची आवश्यकता आहे का, अशा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी उपस्थित केला. दिघा गाव रेल्वे स्थानक, ऐरोली नाका येथे नागरिकांची मागणी असताना हा प्रस्ताव आणल्याने सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ठेकेदार कोण, त्याला देण्यात येणारा निधी किती असेल, याबाबत माहिती सभागृहाला देण्यात आली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा, असे चौगुले म्हणाले.

असे असेल खर्चाचे नियोजन
‘हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल’ या प्रणालीनुसार प्रकल्पाच्या एकूण खर्चातील ३० टक्के रक्कम सुरुवातीला ठेकेदाराला देण्यात येणार असून उर्वरित ७० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर तातडीचा आर्थिक ताण पडणार नाही, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com