हापूसची आवक वाढल्याने दरात घसरण

हापूसची आवक वाढल्याने दरात घसरण

Published on

तुर्भे, ता. २४ (बातमीदार) ः वाशी येथील बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात १५ ते २० टक्क्यांची घसरण झाली आहे. गुढीपाडव्यापर्यंत आवक कमी असल्यामुळे दर चढे राहिले होते; मात्र आता बाजारातील परिस्थितीत बदल होत आहे.

बाजारात कर्नाटकमधून १,२७,६१७ पेट्या, तर कोकणातून १३,९३० पेट्या आंब्यांची आवक सोमवारी (ता. २३) झाली. विशेष म्हणजे, कर्नाटक आंब्यांच्या तुलनेत कोकणातील हापूसची आवक वाढल्याने स्थानिक आंब्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. यंदा वाढलेले पावसाचे प्रमाण, थंडी आणि मोहोराच्या काळात पडलेले रोग यामुळे कोकणातील आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बाजारात हापूस आंब्याची आवक कमी होती. सामान्यतः मार्चमध्ये हापूसचा मुख्य हंगाम सुरू होऊन आवक ३० हजार पेट्यांपर्यंत पोहोचते.

गुढीपाडव्याच्या सणादरम्यान मागणी वाढल्याने आवकही मोठ्या प्रमाणात वाढते; मात्र यंदा गुढीपाडव्याच्या काळात फक्त १३ हजार पेट्यांची आवक झाली होती, तर मागील वर्षी याच कालावधीत सुमारे ४० हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या होत्या. आता आवक वाढू लागल्याने दरात घट होत असल्याचे चित्र आहे.
मागील आठवड्यात तीन ते पाच डझन पेटीमागे २,५०० ते ९,००० रुपये दर होता. सोमवारी हा दर घसरून दोन हजार ते सहा हजारापर्यंत आला, तर कर्नाटक आंबा ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता.

हापूस आंब्याची आवक १ एप्रिलपासून आणखी वाढण्याची शक्यता असून दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आंबाप्रेमींना येत्या काळात दिलासा मिळणार आहे.
- संजय पिंपळे, फळ व्यापारी

Marathi News Esakal
www.esakal.com