

सॅटिस पुलाच्या झिजलेल्या पायऱ्यांमुळे अपघात
प्रवासी आक्रमक; महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील सॅटिस पुलावरील झिजलेल्या पायऱ्यांमुळे प्रवाशांच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेने ठाणे महापालिकेकडे निवेदनाद्वारे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही संस्थेकडून देण्यात आला आहे
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मंगळवारी (ता. २४) आयुक्त सौरभ राव यांना याबाबत निवेदन दिले आहे. सॅटिस पुलावरील जिन्यांच्या पायऱ्या मोठ्या प्रमाणावर झिजून गुळगुळीत झाल्या आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी आणि नेहमीच्या प्रवासादरम्यानही प्रवाशांचे पाय घसरून अपघात होत आहेत. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक धोकादायक बनण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दररोज हजारो प्रवासी या पुलाचा वापर करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पायऱ्यांची दुरुस्ती करावी आणि आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी संस्थेने केली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करून प्रवाशांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा पुढील काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही संस्थेकडून दिला आहे.