

देहरजे प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप
भूसंपादन अधिकाऱ्याची बैठकीला दांडी
विक्रमगड, ता.२६ (बातमीदार)ः तालुक्यातील साखरे येथे देहरजे प्रकल्पामुळे विस्थापित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला भूसंपादन अधिकारी गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.
साखरे, खुडेद, जांभा, सुकसाळे ग्रामपंचायत हद्दीतील ४०२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून बंधाऱ्याचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच धरणात पाणीसाठा सुरू झालेला असताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचा मोबदला निश्चित करण्यात आलेला नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना यावर्षी लागवडीखालील जमिनीवर शेती करता आलेली नाही. वारंवार बैठका होऊनही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप आहे. अशातच भूसंपादन विभागाचा प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने मोबदल्यासंदर्भातील प्रश्नांवर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात संतापाची भावना आहे.
------------------------
मागणीवर ठाम
अनेकवेळा बैठका होऊनही प्रश्न प्रलंबित असल्याचे प्रकल्पग्रस्त राजू थोरात यांनी सांगितले, तर थातूरमातूर बैठका घेऊन प्रश्न सुटणार नाही. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी येऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी ठाम मागणी प्रकल्पग्रस्त आनंद महाले यांनी केली.